Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedफुकट्यांच्या उलट्या बोंबा

फुकट्यांच्या उलट्या बोंबा

देशाच्या उत्पन्नात शेतीचा मोठा वाटा तर आहेच पण कोरोनाच्या महामारीत शेतकर्‍यांनी देश जगवला. तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत धान्य, भाजीपाला आला. सॅनिटायझरचे अल्कोहोल आमच्या शेतातून आले. मास्कचा कापूस शेतातून आला व देशाची अर्थव्यवस्था सावरायला हातभार लावणारे मद्य शेतकर्‍याच्या ऊस- द्राक्षापासून आले तरी शेतकरी फुकटे? शेतकरी किती कर भरतो, हे ढोबळ मानाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आयकर भरणारे अनेक पांढरपेशे शेतकर्‍यांना फुकटे म्हणून हिणवत असतात, त्यांनी शेतकरी भरत असलेल्या कराचा विचार करावा…

शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली. कसले अनुदान जाहीर झाले की, शहरातले चाकरमाने अतिशय कडवट शब्दात समाजमाध्यमांवर आपली प्रतिक्रिया नोंदवतात. हरामी, फुकटे, माजलेले, कर्जबुडवे वगैरेसारखे जिव्हारी लागणारे विशेषणे वापरतात. आमच्या कराच्या पैशातून ही उधळपट्टी सुरु आहे. यांचे लाड पुरे! काय उत्तर द्यावे? मग शेतकरी खरेच फुकटे आहेत का? याचा शोध घ्यायचं ठरवलं.

- Advertisement -

शेती उत्पन्नावर आयकर लावायची शेतकरी संघटनेची मागणी

शेती उत्पन्नावर कधी आयकर लावल्याचे आठवत नाही. पण 1980च्या दशकात, शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेती उत्पन्नावर आयकर लवण्याची जाहीर मागणी करुन मोठ्या वादाला तोंड फोडले होते. ती मागणी कधी मान्य झाली नाही. त्याला दोन कारणे असावीत. पहिले शेती धंदा तोट्याचा आहे हे सर्व राज्यकर्त्यांना माहीत आहे. मग इन्कमच नाही तर टॅक्स कशाचा? हा प्रश्न निर्माण होणार होता. तसेच सत्तेत असलेले व राहुन गेलेले सर्व नेत्यांनी व बड्या नोकरशाहांनी आपले बेहिशोबी उत्पन्न लपविण्यासाठी शेतीचा वापर केला आहे. एक दोन एकरात कोट्यवधी रुपयांचे वांग्याचे उत्पादन मिळल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. या मंडळींनी आयकर विभागाला दाखवलेले शेतीचे उत्पन्न तपासायचे म्हटले तर ई. डी. ला मोठे काम होऊन बसेल.

शेतकरी कर भरतो का ?

शेतीला आयकर नाही, म्हणजे शेतकरी कर भरतच नाही का? मी म्हणेल शेतकर्‍यांइतका कर कोणीच सरकारला देत नाही. एक पाच एकराचा शेतकरी शेतामध्ये पीक घेण्यासाठी काय काय करतो? ट्र्ॅक्टर घेतो, अवजारे घेतो, रासायनिक खते घेतो, कीटकनाशके वापरतो, सिंचनासाठी विद्युत पंप बसवतो, त्याला स्टार्टर केबल लागते, पाइपलाइन लागते, ठिबक संच लागतो, ट्र्ॅक्टरला डिझेल लागते, त्याचे टायर बदलावे लागतात असे असंख्य वस्तू शेतकरी वापरतो. ज्याच्यावर तो केंद्राचा जी.एस.टी. भरतो, राज्याचा जी.एस.टी. भरतो. या त्याच्या प्रपंचासाठी लागणार्‍या वस्तू नाहीत, व्यवसायासाठी लागणार्‍या वस्तू आहेत. याच्यावर भरलेला जी.एस.टी. त्याला कोणत्याच रुपाने कधीच परत मिळत नाही. सगळा सरकार जमा.

व्यापार्‍याने माल खरेदी करताना भरलेला जी.एस.टी. माल विकताना वसूल करतो. एखाद्या उद्योजकाने वस्तू, समजा फ्रीज किंवा वॉशिंग मशीन तयार करताना सुटे भाग खरेदी करताना भरलेला जी.एस.टी.तो ती वस्तू विकताना वसूल करतो. शेतकर्‍याने ट्रॅक्टर, खते, कीटकनाशके, पाईप वगैरेवर भरलेला जी.एस. टी. त्याच्या उत्पादनातून वसूल करण्याची काहीच सोय नाही. याशिवाय प्रपंच चालवण्यासाठी ज्या वस्तू खरेदी करतो व त्यावर भरलेला जी.एस.टी. वेगळाच.

शेतकर्‍यांवर लादलेला हा जीएसटी, कर नाही का? बिगर शेतकरी लोकांना आयकर भरावा लागतो तो किती? जास्तीत जास्त 30% तेही सर्व खर्च जाऊन उरलेल्या रकमेवर. त्यात पाच लाखांपर्यंत सूट आहे व कर चुकवायचे असंख्य मार्ग आहेत. जिवन विमा घेतला की आयकरात 20% सूट. शेतकर्‍याने वस्तू घेतली म्हणजे कर गेला, परत हिशोबाची भानगडच नाही.

पांढरपेशे किती कर भरतात ?

समजा एखाद्या कर्मचार्‍याला दरमहा 50 हजार रुपये वेतन आहे. त्याचे वर्षाचे उत्पन्न झाले 6 लाख. त्यातून करमाफीची सवलत असलेले 5 लाख गेले तर तो एक लाख रुपयावर 5% कर भरतो. म्हणजे वर्षाकाठी तो शासनाला 5 हजार रुपये कर भरतो. 1 लाख रुपये दरमहा वेतन असेल तर 7 लाख रुपयांवर 10% आयकर भरतो. म्हणजे 70 हजार रुपये वार्षिक कर. (यातही कर चुकवेगिरी केली नाही तर.) बाकी कपडा लत्ता, किराणा, गृहोपयोगी वस्तुंच्या खरेदीवर जसे बिगर शेतकरी वर्ग अप्रत्यक्ष कर भरतो तसा शेतकरी ही भरत असतो त्याची तुलना इथे करणार नाही. शेतकरी त्याच्या व्यवसायासाठी लागणार्‍या मशीनरी, उपकरणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, वीजपंप, केबल, पाईप, डिझेल यासाठी जसा खर्च करत असतो तसा चाकरमान्यांना करायची आवश्यकता पडत नाही.

शेती अवजारे व संरचनेवर शेतकरी किती कर भरतो ?

आता शेतकरी किती कर भरतो, याचा आंदाज काढूया. एक पाच एकरचा ट्रॅक्टरमालक शेतकरी आहे, तो किती व कसा कर भरतो? आज सर्व साधारण विकल्या जाणार्‍या 50 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची किंमत 7 लाख रुपये आहे. त्याच्यावर 12% जीएसटी आकारला जातो, म्हणजे 84 हजार रुपये. म्हणजे 50 हजार रुपये वेतनावर काम करणार्‍या कर्मचार्‍याला इतका आयकर भरायला किमान साडे सोळा वर्ष लागतील. ट्रॅकटरला सरसरी 3 हजार लिटर डिझेल वर्षाला लागते.

डिझेलवर जी.एस.टी. नाही पण केंद्र शासनाचा 15.33 रुपये प्रतिलिटर अबकारी कर आहे व राज्य शासनाचा 25.38 रुपये प्रतिलिटर व्हॅट आकारला जातो. याचा अर्थ एक टॅ्रक्टरमालक शेतकरी एका वर्षात केंद्र शासनाला, 3000 लिटर डिझेल वापरल्यास, 45 हजार 990 रुपये कर देतो व राज्य शासनाला 76 हजार 140 रुपये कर देतो. एकूण 1 लाख 22 हजार 130 रुपये शेतकर्‍याच्या फक्त डिझेल खरेदीतून मिळतात. ही रक्कम 1 लाख रुपये वेतन घेणार्‍या कर्मचार्‍याने भरलेल्या आयकराच्या जवळपास दुप्पट आहे.

फक्त डिझेलवर भरलेला जीएसटी !

ट्रॅक्टर वापरणार्‍याला टायर बदलावे लागतात. ट्रॅक्टरच्या मागच्या मोठ्या टायरवर 28% जी.एस.टी. होता, तो आता 18% केला आहे व समोरच्या लहान टायरवर अजूनही 28% जीएसटी द्यावा लागतो. का तर हे लक्झरी आयटममध्ये मोडतात. ही सात लाखांची मशीन शेतकरी गुडघ्याइतक्या चिखलात वापरतात अन् तो लक्झरी आयटम? आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना या विषयावर कधी बोलावे नाही वाटले का? ट्रॅक्टर दुरुस्त करायचा म्हटला की, प्रत्येक सुट्या भागावर (स्पेअर पार्ट) वर वेगळा जी.एस.टी. द्यावा लागतो. शेतीसाठी लागणार्‍या प्रत्येक वस्तू, अवजार, उपकरणावर शेतकरी कर भरत असतो, तो त्याला पुन्हा कधीच मिळत नाही.

ट्रॅक्टर तयार करणारी कंपनी अनेक उद्योगांकडून सुटे भाग विकत घेऊन ते एकत्र करुन ट्रॅक्टर तयार करते व नंतर सर्व भरलेला जी.एस.टी. शेतकर्‍यांकडून वसूल करते. पण हाच ट्रॅक्टर वापरुन शेतकर्‍याने तयार केलेला शेतमाल विकून त्याला भरलेला जी.एस.टी. किंवा डिझेलसाठी भरलेला व्हॅट वसूल करण्याची कोणतीही संधी नाही.

कराच्या पैशातून अनुदान नेमके कोणाला ?

शेतकर्‍याने वस्तू खरेदी केली म्हणून दिलेला कर पण शेतकर्‍याने पिकवलेला माल जनतेला स्वस्त खायला मिळावा म्हणून सरकार शेतीमालाच्या दरावर नियंत्रण ठेवते. या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकर्‍यांना मिळालेल्या उणे अनुदानाचे आकडे तर विस्मयकारक आहेत. 1991 साली भारत सरकारने गॅट कराराला दिलेल्या अधिकृत लेखी अहवालानुसार, भारतातील शेतकर्‍यांना 72% उणे अनुदान (negative subsidy) मिळत होते. ओईसीडी च्या अहवालात नमूद केले आहे की, 2018 पर्यंत भारतातील शेतकर्‍यांना उणे 14% अनुदान दिले जाते. त्याद्वारे होणारी लूट 85 हजार कोटी रुपये आहे. कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी हे त्यांच्या पुस्तकात लिहितात की, भारतातील शेतकर्‍यांना 2001 ते 2016 या कालावधीत जागतिक बाजारपेठेपेक्षा 700 बिल्लियन डॉलर कमी मिळाले म्हणजे 5 लाख 18 हजार कोटी रुपये इतका कर शेतकर्‍यांनी सरकारला भरला आहे.

कोणासाठी अन्न-धान्य स्वस्त ठेवले जाते ?

शेतकर्‍यांला फुकट्या म्हणणार्‍यांसाठी जगातील 40 देशांचा अभ्यास केला असता शेतकर्‍यांना उणे अनुदान देणारे तीन देश आहेत. भारत, व्हिएतनाम व युक्रेन व ग्राहकांना अधिक अनुदान देणारे तीन देश आहेत त्यात भारत, अमेरिका व युक्रेन. अमेरिका शेतकर्‍यांना ही अधिक अनुदान देते व ग्राहकांनाही अधिक अनुदान देते पण भारतातील ग्राहकांना मात्र जागात सर्वात जास्त अनुदान दिले जाते. अमेरिकेच्या जवळपास दुप्पट आणि शेतकर्‍यांना उणे!! या मार्गाने लुटलेला पैसा कर मानायचा नाही का? एखाद्याने अब्जावधी रुपये कमवले तरी त्याला 30% पेक्षा जास्त आयकर भरावा लागत नाही. पण शेतकर्‍यांनी 72% टक्के कर भरला आहे. सरकारी आकडे सांगतात. आहे की नाही, फुकट्यांच्या उलट्या बोंबा.

कृषी निविष्ठांवर किती कर भरावा लागतो

विदर्भातील कपाशीचा शेतकरी एकरी साधारण 4 हजारांची रासायनिक खते वापरतो. म्हणजे पाच एकराला 20 हजार त्यावर 5% जीएस टी होतो 1 हजार रुपये. साधारण 5 हजारांचे कीटनाशक, तणनाशक वापरतो. 5 एकरला 25 हजार रुपये होतात. त्यावर 12% जी.एस.टी. चे होतात 3000 रुपये. एका पिकाला शेतकरी 4000 रुपये कर भरतो. तरी तो फुकटाच? पश्चिम महाराष्ट्रातील उसाचा शेतकरी उसाच्या पिकाला साधारण 30 हजारांचे रासायनिक खत वापरतो. एकरी 1500 रुपये जीएसटी भरतो. म्हणजे पाच एकर उसाचा शेतकरी 7500 रुपये दर साल जी.एस.टी. भरतो. ही रक्कम 80 हजार रुपये वेतन घेणार्‍या कर्मचार्‍याच्या आयकराइतकी आहे. या पिकातून शेतकर्‍याला काही नफा होईल की नाही, सांगता येत नाही. पण जी.एस.टी. मात्र गेला तो गेलाच. शेतकर्‍याने विकलेल्या मालावर 12% जी.एस.टी. मिळायला काय हरकत आहे?

व्यापार, उद्योग व व्यवसायातील आयकर

नोकरदारांप्रमाणेच अनेक चीज-वस्तुंचा व्यापार करणारे, कारखाने उभे करुन वस्तू निर्माण करणारे व सेवाक्षेत्र तसेच डॉक्टर, वकील, सिनेकलाकार वगैरेसुद्धा आयकर भरतात. पण त्यांनी त्या व्यवसायासाठी केलेला खर्च आयकर भरताना वजा करतात. व्यवसायानिमित्त प्रवास, बांधकाम, गाड्यांचा घसारा, कामगार विमा, कागद, पेन , मेकअपच्या सामानाचा खर्च, सर्व काही आयकरातून वगळले जाते. शेतकर्‍यांनी व्यवसायासाठी केलेल्या खर्चाचा हिशोब तर शेतमालाची आधारभूत किंमत ठरवतानासुद्धा धरत नाहीत.

शेतकर्‍यांनी देश जगवला

देशाच्या उत्पन्नात शेतीचा मोठा वाटा तर आहेच पण कोरोनाच्या महामारीत शेतकर्‍यांनी देश जगवला. तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत धान्य, भाजीपाला आला. सॅनिटायझरचे अल्कोहोल आमच्या शेतातून आले. मास्कचा कापूस शेतातून आला व देशाची अर्थव्यवस्था सावरायला हातभार लावणारे मद्य शेतकर्‍याच्या ऊस- द्राक्षापासून आले तरी शेतकरी फुकटे?

शेतकरी किती कर भरतो, हे ढोबळ मानाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आयकर भरणारे अनेक पांढरपेशे शेतकर्‍यांना फुकटे म्हणून हिणवत असतात. त्यांनी शेतकरी भरत असलेल्या कराचा विचार करावा. इतका कर भरुनही त्याला नफा नावाची गोष्ट या समाजवादी व्यवस्थेत पाहायला मिळाली नाही. सतत तोटा सहन केला व ज्या दिवशी सहनशीलतेचा अंत होतो, तेव्हा तो झाडाला नायलॉनचा दोेर बांधून फाशी घेतो, त्या दोरावरही त्याने 12% जीएसटी भरलेला असतो.

शेतकरीही विमानाने फिरेल

शेतकरी संघटनेची मागणी आहे, शेतकर्‍यांना आयकर लावा; पण सरकार लावत नाही. याची कारणे वर सांगितली आहेत. शेती उत्पन्नाला इन्कम टॅक्स लावा. एकदाचा हिशोब होऊ द्याच. इन्कम टॅक्स भरणारे जर विमानाने फिरू शकत असतील तर शेतकर्‍यांना इन्कम होऊ द्या, तो ही टॅक्स भरेल व विमानानेही फिरेल, यात शंका नाही. –

अनिल घनवट ,मो. 9923707646 (लेखक हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या