Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedआल्या श्रावण सरी, पुजू आता मंगळागौरी

आल्या श्रावण सरी, पुजू आता मंगळागौरी

द्वारकाधीश दिगंबर जोशी Dwarkadhish Digambar Joshi

मंगळागौर ही एक सौभाग्यदात्री देवता आहे. हिची पूजा ही नवीन लग्न झालेल्या मुलींचे नित्य व्रत आहे. लग्न झाल्यानंतर पाच किंवा सात वर्ष नवीन लग्न झालेल्या मुली श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी हे व्रत करतात. या व्रतात शिव आणि गणपती Shiva and Ganapati यांच्यासह गौरीची पूजा करायची असते. या व्रतासाठी पुढीलप्रमाणे साहित्य लागते.

- Advertisement -

दुर्वा, आघाड्याची पाने, तांदूळ, चण्याची डाळ, सोळा प्रकारची पत्री, पाटापुटा (पाटा वरवंटा) व सोळा दिवे. मंगळागौरीच्या Mangalagauri पूजेसाठी चौरंग मांडतात. त्याला केळीचे खांब बांधून मखर करतात. ते वेलींनीआणि पानांनी सुशोभित करतात चौरंगावर गौरीची मूर्ती स्थापतात. जवळ पाटापुटा (पाटा आणि वरवंट) ठेवतात . व्रतकर्ती स्त्री स्नान करून व पांढरे कपडे नेसून प्रथम दिवा लावते.

मग षोडशोपचारे पूजा करतात. पूजेत अंगपूजा, पत्रीपूजा पुष्पपूजा अशा अंगभूत पूजा असतात. पूजेचा मंत्र असा

पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङगले ।

अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽस्तु ते ॥

पूजा झाल्यावर पुरोहिताला सौभाग्यवायन देतात; सोळा वातीची मंगलारती करतात; मग हातात थोडे तांदूळ घेऊन बसतात व मंगळागौरीची कहाणी ऐकतात.

कहाणी ऐकून झाल्यावर मुली हातातले तांदूळ देवीला वाहतात. दुपारी मौन धरून जेवतात. रात्री उपवासाचे पदार्थ खातात. पाच वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करतात. त्याही वेळी तशीच मंगळागौरीची Mangalagauri पूजा करतात. गव्हाच्या कणकीचा दिवा करून त्यात तूपवात घालून तो तेवत ठेवतात. सोळा प्रकारची फुले, तांदूळ, धणे, चण्याची डाळ, जिरे यांचे सोळा-सोळा दाणे, सोळा परीची पत्री व पाच बिल्वदळे देवीला वाहतात. सोळा दिव्यांनी ओवाळतात. रात्री जागरण करतात. दुसर्‍या दिवशी अग्नि स्थापना करून तिल, घृत व पायस यांचा होम करतात. सुपात खण-लुगडे, पक्वान्ने व फळे घालून आईला किंवा तिच्या अभावी माहेरकडच्या मोठ्या सुवासिनीला वायन देतात. आठ दंपतींना भोजन घालतात. मग गौरीचे विसर्जन करतात. व्रताचा प्रघात आहे.

नववधू पहिली मंगळागौर बहुधा माहेरी पुजते. या पूजेसाठी इतरही काही नववधूंना बोलावतात. त्यांना वसोळ्या किंवा वशेन्या म्हणतात. सर्वजणी एकत्र बसून पूजा करतात. पूजा झाल्यावर देवीच्या मूर्तीवर फूलपत्रींची रास करतात. त्या रात्री रात्रभर जागतात. रात्री जागरण हे या व्रताचे विशेष विधान आहे. त्या जागरणासाठी आप्तेष्ट बायका आणि शेजार पाजारच्या बायका यांना बोलावतात. मग मुली झिम्मा-फुगड्या खेळतात, उखाण्यासह नवर्‍याचे नाव घेतात, गाणी म्हणतात.

एखादी वशेळी झोपली, तर तपेलीच्या गळ्याला दोरीचा फास लावून तिचे दुसरे टोक तिच्या पदराला बांधतात. मग ‘तपेलीची लांब दोरी, तपेली संभाळ पोरी’ असे म्हणून तिला जागवतात. दुसर्‍या दिवशी सकाळी पंचोपचार पूजा करून गौरीचे विसर्जन करतात. तिच्यावरची फूल-पत्री नदीत किंवा विहिरीत सोडून मग मुली आपापल्या घरी जातात. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी अशी मंगळागौर बसवितात.

- Advertisment -

ताज्या बातम्या