वांबोरी चारीच्या आवर्तनाचा ना. तनपुरेंनी केला ‘पचका’

वांबोरी चारीच्या आवर्तनाचा ना. तनपुरेंनी केला ‘पचका’

सार्वमत

क्षमता नसतानाही आवर्तनाचा अट्टाहास; शासनाचे 2 कोटी रुपये पाण्यात

राहुरी (प्रतिनिधी) – मागील दोन महिन्यापूर्वी मुळा धरणाचा साठा खालावल्यानंतर क्षमता नसतानाही वांबोरी चारीला ना. प्राजक्त तनपुरे यांनी राजकीय अट्टाहासापायी 200 दलघफूूट पाणी व 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, वांबोरी चारीअंतर्गत 102 तलावांपैकी केवळ 40 तलावात पाणी पोहोचले. त्यातच वांबोरी चारीला गळती लागल्याने आवर्तन बंद करावे लागले. त्यामुळे उर्वरित 62 तलावांचे घसे कोरडेच राहिले. पर्यायाने शासनाचे 2 कोटी रुपये पाण्यात गेले.

मुळा धरणाचा साठा 14 हजार 350 दलघफूटावर स्थिरावल्यानंतर धरणातून वांबोरी चारीला पाणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसते. कारण या पातळीवर पाणी गेल्यास वांबोरी चारीचा फूटव्हॉल्व्ह उघडा पडतो. मात्र, ना. तनपुरे यांनी थेट ना. जयंत पाटील यांच्याकडे आपले राजकीय वजन वापरून वांबोरी चारीसाठी 200 दलघफूट पाणी व 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, वांबोरी चारीचे आवर्तन अर्ध्यावरच सोडावे लागले.

त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वांबोरी चारीच्या आवर्तनाकडे डोळे लावून बसलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांची निराशा झाली. तलावाच्या पाण्यावर आणि वांबोरी चारीच्या भरवश्यावर वाट पाहणारी पिके जळून गेली. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला. एकीकडे अट्टाहासापायी शासनाचे सुमारे 2 कोटी रुपये पाण्यात जात असताना शेतकर्‍यांचेही आर्थिक नुकसान झाले.
आमदार होण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे हे तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिलेंची ‘फोटो सेशन’करणारा आमदार म्हणून खिल्ली उडवित होते. मात्र, वांबोरी चारीच्या आवर्तनाचा विचका करताना फोटो सेशन करून त्याचे श्रेय ना. तनपुरे यांनी पदरात पाडून घेत कर्डिलेंचाच कित्ता गिरविल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com