कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लॉक डाऊन असून १४४ कलमासह सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे.बंदमुळे रस्ते निर्मनुष्य झाले असून,चोपडा शहर व ग्रामीण भागात सर्वत्र शुकशुकाट आहे.तर जिवनाश्यक बाब म्हणून दवाखाने,मेडिकल,पेट्रोल पंपा सह किराणा, भाजीपाला, दूध विक्रीची दुकाने सुरू आहेत.
दुसरीकडे बंदमुळे नागरिकांची किराणा खरेदीसाठी एकच गर्दी होतांना दिसत आहे.गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून प्रत्येक दुकानदारांनी येणाऱ्या गिऱ्हाईकामध्ये एक मीटर (तीन फूट) फुटाचे अंतर ठेवावे त्यासाठी दुकाना पुढे रंगाच्या पट्ट्यांची मार्कींग करावी अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
तसेच संचारबंदी काळात शहरातील व ग्रामीण भागातील दुकानदार किराणा मालाची जादा दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या असून,जादा दराने विक्री करतांना आढळल्यास संबधित दुकानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार अनिल गावित यांनी दिला आहे.