सार्वमत
मुंबई – खोटं बोल पण रेटून बोल हे राज्य सरकारचं धोरण आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलंच माहित आहे. सरकारला आम्ही मदतच करतो आहोत. मात्र महाविकासआघाडी सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल असंही ते म्हणाले.
ते म्हणाले, मी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी तासन् तास बैठका घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागली. एवढ्या बैठका करोनाविरोधातली लढाई लढण्यासाठी घेतल्या असत्या तर महाराष्ट्राची आज ही अवस्था झाली नसती.
खरं बोलायचं असेल तर एकच माणूस पुरेसा असतो. मात्र फेकमफाक करायची असेल तर तीन माणसं लागतात अशाच प्रकारे तीन मंत्र्यांनी एकत्रित येऊन पूर्णपणे विसंगत माहिती देऊन माझ्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
एक तर त्यांच्याकडे असलेली माहिती अपुरी आहे. माहिती न घेता आले आहेत किंवा माहिती असूनही ते चुकीचं बोलत आहेत.
अनिल परब विचारत आहेत की गहू कुठे आहेत? गहू आम्हाला मिळाला नाही. मी कालदेखील हेच सांगितलं की 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो हा जो गहू तुम्ही अन्न सुरक्षे अंतर्गत देत आहात तो केंद्र सरकारने दिलेलाच गहू आहे. 24 रुपये आणि 32 रुपये किलोने घेतलेला हा गहू आहे. तरीही हा गहू कुठे आहे असा प्रश्न परब यांना का पडला हे मला समजत नाही.
फडणवीस यांची पत्रकार परिषद आभासी ; महाविकासआघाडीचं प्रत्युत्तर