श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहराला पाणीपुरवठा करणारा गोंधवणी शिवारातील मुख्य साठवण तलाव निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. ज्या तलावाबाबत काल शहरात गैरसमज निर्माण झाला होता. नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.
काल दुपारी आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी समीर शेख, नगरेसवक रवि पाटील, दीपक चरण चव्हाण, पाणीपुरवठा आधिकारी यांनी भेट देऊन तलावाची पाहणी केली. यावेळी तलावाचे निर्जंतुकीकरणाचे काम सुरू होते. तलावात क्लोरिन पावडर टाकण्यात आली.
तलावातील पाण्याचे सॅम्पल तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आले असून नागरिकांनी उलट-सुलट अफवांकडे लक्ष देऊ नये. शहराला चांगलाच पाणी पुरवठा करण्यात येत आहे, असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.