मुंबई:
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट झाली. 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी ठाकरे यांच्या समवेत चर्चा झाली आहे. आंदोलन शांततेत पार पाडावे या संदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे.
नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदू भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे, हे स्पष्ट केले. त्याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
राज्यात डिटेन्शन कॅम्प उभारले जाताय हे मी तीन महिन्यांपूर्वी माध्यमांना सांगितले होते, त्याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली. त्यासोबत अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. असे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी धनराज वंजारी, डॉ. अरुण सावंत, आ. कपिल पाटील उपस्थित होते.