तरुणाचा मृत्यू, कर्जत तालुक्यातील धक्कादायक घटना
कर्जत (वार्ताहर)- कर्जत शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जामदारवाडा येथे मोहनराव लाढाणे या शेतकर्याच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडून कानिफनाथ रामदास बळे (वय 22) या शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच, ही दुसरी घटना घडल्याने तालुका हादरून गेला आहे.
याबाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे संतोष अंकुश घालमे याने कर्जत पोलीस स्टेशनला खबर दिली की, संतोष घालमे हा जमदारवाडा येथे त्यांचे सासरे शिवाजी हरिभाऊ काळे यांच्या घरी आज दि. 2 फेबुवारी रेाजी कामानिमित्त आला.
दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजी हरिभाऊ काळे हा घरी पळत आला आणि कानिफनाथ हा मोहनराव लाढाणे यांच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडला आहे,असे सांगितले.
यानंतर सर्वजण घटनास्थळी गेले असता विहिरीमध्ये पाणी असल्याने ट्रॅक्टर किंवा कानिफनाथ कोणीच दिसत नव्हते. मात्र विहिराच्या पाण्यावर डिझेलचा तवंग आणि काठावर टॅक्टर पडल्याच्या खुना दिसत होत्या. त्यानंतर नातेवाईकांना बोलविण्यात आले व मोटारीच्या साहय्याने विहिरीतील पाणी बाहेर काढल्यावर खाली ट्रॅक्टर पडल्याचे दिसून आले. क्रेनच्या साहाय्याने टॅक्टर बाहेर काढण्यात आला. तसेच कानिफनाथ रामदास बळे याचा मृतदेह शोधण्यात यश आले.