राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार लांबणीवर

jalgaon-digital
2 Min Read

दोन टप्प्यात वेतन देण्याच्या आदेशामुळे पेच; नव्याने बिले करावी लागणार – गाडगे

अस्तगाव (वार्ताहर)- राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन उणे प्राधिकार पत्राने (बीडीएस) काढण्याची परवानगी शालेय शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात दिली होती. मात्र, आता राज्य शासनाने वेतन दोन टप्यात देण्याचे आदेश दिल्यामुळे पूर्वीचे आदेश मागे घ्यावे लागल्याने राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार लांबणीवर पडण्याची शक्यता शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी व्यक्त केली आहे.

प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात निधीअभावी मार्च महिन्याचे वेतन उशिरा होत असते. अशावेळी उणे प्राधिकार पत्राचा वापर करून वेतन देण्याच्या सूचना कोषागारांना केल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेतन वेळेवर होण्यासाठी सोपस्कार पूर्ण केले होते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचे पगार दोन टप्प्यांत होणार आहेत. राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पगार बिले 20 मार्चपूर्वीच ट्रेजरीकडे जमा झाली होती. सादर केलेली पगार बिले ही शंभर टक्के वेतनानुसार काढलेली होती.

वेतन विभागाशी बोलणी केल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली की, शासन आदेशात नमूद टक्केवारीत पगार बिले काढावी लागणार आहेत. त्यामळे जमा केलेली पगार बिले रद्द झाली आहेत. पुन्हा नव्याने पगार बिले बनवावी लागणार आहेत. राज्यभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे मुख्याध्यापक व लिपिक हे बिले बनवू शकणार नाहीत. 14 एप्रिलनंतर जरी बिले बनवून पाठवली तरी पगार होण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस आवश्यक आहेत. त्यासाठी शिक्षक भारतीचे आ. कपील पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा पगार एप्रिलमध्ये होण्याची आशा धूसर झाली आहे असे मत व्यक्त केले आहे.

शिक्षण विभागाने शिक्षक शिक्षकेतरांचे पगार लवकर होण्यासाठी योग्य ते आदेश काढावेत, अन्यथा या कर्मचार्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर तातडीने तोडगा काढावा. अशी अपेक्षा शिक्षक भारतीचे आ. कपील पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी व्यक्त केली व पगार लवकरात लवकर काढावे, अशी मागणी शिक्षक नेते सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, तुषार मरकड, संजय तमनर, संभाजी पवार, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर आदींनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *