26 परदेशींचा कोठडीतील मुक्काम 14 दिवसांनी वाढला

26 परदेशींचा कोठडीतील मुक्काम 14 दिवसांनी वाढला

अहमदनगर (प्रतिनिधी) – दिल्ली येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नगरमध्ये दाखल झालेल्या 26 परदेशींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता यावर सुनावणी झाली. सर्व परदेशी नागरिकांना शुक्रवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी पारनेरच्या कारागृहात करण्यात आली आहे. सर्व परदेशी नागरिकांना कारागृहातील दोन बराकीत ठेवण्यात आले आहे.

सर्व परदेशी नागरिक नवी दिल्ली येथे झालेल्या मरकज कार्यक्रमातून आलेले होते. त्यांनी पर्यटनच्या नावाने व्हीसा मिळवून धर्मप्रसार करण्यासाठी वापर केल्याच्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता या 26 परदेशी तबलिगींना आधी सात दिवसांची पोलीस कोठडी व नंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पर्यटनाचा व्हिसा असताना ते अनधिकृतपणे धर्मप्रसार करत असल्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वीच उघडकीस आला आहे. या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते आणि त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात काही जण पॉझिटीव्हही आढळले होते. क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. 26 परदेशी नागरिकांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परदेशी नागरिकांना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी न्यायालयात आपली बाजू मांडली होती. यावर रविवारी सुनावणी झाली तर, सर्वांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. आता या सर्वांचा मुक्काम पारनेरच्या कारागृहात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com