Friday, April 26, 2024
Homeनगरसुप्यात बालविवाह रोखला

सुप्यात बालविवाह रोखला

नवरी हिरमुसली, नवरदेवही रडला !

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालविवाह रोखण्याबाबत कितीही जनजागृती करण्यात आली तरी अजूनही महाराष्ट्रात मुलींचे 18 वर्षांच्या आधी लग्न करण्याचे प्रकार सुरूच आहेत. असाच एक प्रयत्न केल्याचे पारनेर तालुक्यामधील सुप्यात समोर आले. 16 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरवण्यात आले होते. सर्व तयारी जोरदार झाली होती. वर्‍हाडी मंडळी जमा होत होती. लग्नघटीका जवळ येत होती. तोच चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते नी पोलीस तेथे आले आणि त्यांनी नवरी मुलीचे वय कमी असल्याने हा विवाह रोखला. याबाबत कुटुंबाकडे विचारणा केली असता हे लग्न रद्द केल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले.

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील एका गावातील मुलीचा विवाह नगर तालुक्यातील वराबरोबर काल रविवार दि.16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.10 वाजता संपन्न होणार होता. दोन दिवसांपासून मंडप सजला होता. पाहुणे आले होते. कलवर्‍या, वरमाया नटल्या होत्या. भोजनाचा सुगंध दरवळत होता. सर्वजण आंनदात लग्न घटीकेची वाट पहात होते. सकाळी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम होता व दुपारी चार नंतर विवाह पार पडणार होता.

सर्व काही सुरळीत चालू असताना नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सकाळी साखरपुड्याची वेळ जवळ आली असताना सुपा पोलीस स्टेशनला मुंबई येथील चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली की आज होणार्‍या विवाहातील वधू ही 16 वर्षे वयाची आहे तेव्हा हा विवाह थांबवावा असे चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी सुचवले व यावर कारवाई करत सुपा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते लग्न मंडपात आले. हा विवाह तुम्हाला कायद्याने करता येणार नाही असे वधू पित्यासह सर्वच वर्‍हाडी मंडळीस ठणकावून सांगितले.

साखरपुडा हळदीसह विवाह थांबला गेला. त्यानंतर दोन्ही पक्षाकडील मंडळी सुपा पोलीस स्टेशनला गेले व पोलिसांना व चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांना विनंती करु लागले. आम्ही खूप खर्च केला आहे. मंडप टाकणे,.पत्रिका वाटणे, सजावट, कपडे खरेदी, शेकडो लोकांचे जेवण बनवले आहे. दुरदुरुन पाहुने आले आहेत. निदान आम्हाला साखरपुडा तरी करु द्या अशी विनंती वधू व वर पक्षाकडील मंडळी करु लागले. तोपर्यंत घटनेची चर्चा गावभर पोहचली होती.

कारण लग्नघटिका जवळ येत चालली असताना मंडपात सामसुम होती. पोलिसांनी वधु वराच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून सांगितले की हा विवाह करता येणार नाही जर तुम्ही तो करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल असे ठणकावून सांगितले आणि उरलीसुरली आशा मावळली. विवाह रद्द होत आहे हे पाहून दोन्ही पक्षाकडील मंडळीना अश्रू अनावर झाले. हळदही रुसली आणि कुंकूही हिरमुसले. लाखो रूपये खर्च वाया गेला. वधुही कोमजली तर वरानेही आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. वर्‍हाडी मंडळींनीही हताशपणे काढता पाय घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या