Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरविनाकारण दुचाकीवरुन फिरणार्‍यांचा शिर्डी पोलिसांकडून बंदोबस्त

विनाकारण दुचाकीवरुन फिरणार्‍यांचा शिर्डी पोलिसांकडून बंदोबस्त

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या शिर्डी नगरीत मागील महिन्यात जगभरातून अनेक परदेशी भाविक दर्शनासाठी येऊन गेले असताना साईबाबांच्या कृपेने अद्यापपर्यंत सुदैवाने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही, मात्र संचारबंदी काळात शहरातील उपनगरात मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याने कायदा मोडणार्‍यांचा शिर्डी पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला असून दुचाकीस्वार तसेच शहरात विनाकारण फिरणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सध्या तिसर्‍या टप्प्यात असून राज्यातील एकुण विस जिल्ह्यात कालपर्यंत 225 कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झाली आहे. संचारबंदी लागू करुन बारा दिवस उलटले आहे. शिर्डी शहरात पहिल्या सात ते आठ दिवस मुख्यमंत्री यांच्या आवाहानाला चांगला प्रतिसाद मिळाला होता मात्र दोन दिवसांपासून शहरातील काही नागरिक रस्त्यावर तसेच उपनगरात क्रिकेट, पत्ते, समुह करुन संचारबंदीचे सर्रासपणे उल्लंघन करत आहे.

- Advertisement -

काही ठिकाणी पत्रकारांनी पत्त्यांचा डाव मांडून खेळणार्‍या लोकांना भावनिक आवाहन केले मात्र त्यालाही न जुमानता अधिक जोरदारपणे सार्वजनिक ठिकाणी डाव मांडून बसण्याचा उपदव्याप सुरूच ठेऊन कायद्याला धाब्यावर बसवले आहे. पोलीस प्रशासन वारंवार सूचना करत आहे. प्रसंगी बळाचा वापर करायला लागला आहे. तरीसुद्धा शिर्डी शहरातील काही उपद्रवी माणसे नाहक प्रशासनाला त्रास देण्यासाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी बाहेर पडत आहे. राज्यशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणार्‍या लोकांना यांच्यामुळे त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे सात रुग्ण झाले असतांना येथील नागरीकांना किंचितही भय वाटत नसल्याचे या माध्यमातून दिसून आले आहे. शिर्डी पोलीस ठाण्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी शहरातील उपनगरात बँरीगेट लावुन कडेकोट बंदोबस्त लावला असून रस्त्यावर दुचाकास्वारांची यथेच्छ धुलाई करुन समज देऊन सोडण्यात आले. मात्र दोन दुचाकी शिर्डी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या असून दूचाकीस्वार पळून गेले आहे. शहरात विनाकारण फिरणार्‍यांची अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात लागू करण्यात आलेला लाँकडाऊनचा कालावधी वाढू शकतो, अशी शंका सुज्ञ नागरीकांनी व्यक्त करून दाखवली.

संचारबंदीच्या काळातील सुरुवातीचेसात दिवस लोकांना घरात बसण्याची सवय लागण्यासाठी होते, आता बर्‍यापैकी मानसिकता आणि पूर्वतयारी झाली. आपल्याकडे अजून एकही कोरोनाचा रुग्ण मिळून आला नाही मात्र विरुंगळ्यासाठी बाहेर पडून या आजाराला घरात आणू नये. शहरातील परिस्थीतीबाबत राज्याचे गृहमंत्री यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून आढावा दिला आहे. येणार्‍या दहा दिवस अतिशय गरजेचे व धोकादायक असून या कालावधीत संचारबंदीची सक्त अंमलबजावणी झाली तरच या गंभीर आजारावर आपण सर्वजण मात करू शकतो.

– राकेश कोते
उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिर्डी.

- Advertisment -

ताज्या बातम्या