Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमला कोणाच्याही परवानगीची गरज नाही- शरद पवार

मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही- शरद पवार

पुणे (प्रतिनिधी) – मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला प्रत्युत्तर दिले आहे. विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. आणि तसं कोणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारत असेल तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. तो सच्चा वारकरी नाही असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वारकरी परिषदेमध्ये लगावला आहे.

शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नेहमी हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱयांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्रक वारकरी परिषदेकडून जारी करण्यात आले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही. मी फारसा लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असते.

- Advertisement -

पुढे बोलताना पवार म्हणाले की, मी प्रसिद्धीसाठी राजकारण करत नाही. तो गैरसमज आहे. कुठलाही हेतू मनात ठेवून इथं आलेलो नाही. पंढरपूर, देहू, आळंदीला, तुळजापूर आणि शेगावला जात असतो. माझा या सर्व ठिकाणी जाण्याचा हेतू हा प्रदर्शन करण्याचा नसतो. राजकारणामध्ये आम्ही आहोत याचा अर्थ अखंड प्रसिद्धीशिवाय आमच्याकडे दुसरे काही नसते, असा गैरसमज आहे. त्या मार्गाला मला जायचं नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची वारकर्‍यांनी केलेली मागणी ही समाजाच्या हिताची आहे. ही मागणी पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. ते नक्की पार पाडेन. याबाबत सरकारमधील संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना तशी विनंती करेन, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समस्त वारकर्‍यांना दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या