महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार

jalgaon-digital
2 Min Read

शरद पवार यांचा विश्वास : ठाकरे यांचा मार्ग योग्य, रिमोट माझ्या हाती नाही

मुंबई: महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे टिकणार आहे. त्यात काहीही अडचण येणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठामपणे व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मार्ग योग्य आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही.

विचारल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचा सल्ला देत नाही. गरज भासली तरच सल्ला द्यायचा अन्यथा लांब रहायचे असे मी ठरवले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चात्मक कार्यक्रमात शरद पवार यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो राज्य कारभार करत आहेत यासाठी किती मार्क द्याल? या प्रश्नावर ते म्हणाले, मार्क देण्यासाठी अजून परीक्षेची वेळच आलेली नाही. मात्र एवढं ठाऊक आहे की उद्धव ठाकरेंचा मार्ग योग्य आहे. सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहेत आणि ते दुसर्‍यांच्या कामात मुळीच हस्तक्षेप करत नाहीत. शिवसेना म्हणून आमचा कधी संपर्क आला नव्हता.

तरुणांना व्हिज
महाराष्ट्र 60 वर्षांचा झालाय तर मी 80 वर्षांचा झालोय. आता या वयात नवे व्हिजन काय पाहणार. वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणे योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचे आणि ते काय करतात ते बघायचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मी आता हळूहळू काम थांबवतोय. आता तरुणांना व्हिजन देण्याचं काम करतोय. कारण नवी पिढी पुढे गेली पाहिजे. त्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे. मी आता तेच करतोय. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहत असतो. त्यांनी विचारले तरच सल्ला देतो. न विचारता सल्ला देणं आणि सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं हे योग्य नसते. त्यामुळे तुमचा मान राहात नाही, असंही पवार यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *