शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त पालख्या आणू नका – डोंगरे

शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त पालख्या आणू नका – डोंगरे

शिर्डी (प्रतिनिधी)- करोना व्हायरसच्या संकटामुळे दिनांक 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून दिनांक 04 जुलै ते 06 जुलै 2020 रोजी येत असलेल्या श्रीगुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पालखी घेऊन पदयात्रींनी करोना विषाणू (कोव्हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिर्डी येथे येण्याचे टाळावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

श्री. डोंगरे म्हणाले, देश व राज्यावर आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होवू नये म्हणून भारत सरकार व राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले असून संस्थानच्यावतीने दिनांक 17 मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.

श्री साईबाबांचा महिमा व त्यांची शिकवणूक संपुर्ण जगात पोहचलेली असून त्यांचा भक्त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. तसेच श्री साईबाबा संस्थानच्यावतीने दरवर्षी श्रीरामनवमी, श्रीगुरुपौर्णिमा, श्रीपुण्यतिथी आदी प्रमुख उत्सवांचे आयोजन करण्यात येते. पालखीसह येणारे पदयात्री या उत्सवांचे प्रमुख्य वैशिष्टये असते. त्यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातुन पालखीसह येणारे पदयात्रींची संख्या ही मोठया प्रमाणात असते.

यावर्षी करोना व्हायरसच्या संकटामुळे समाधी मंदिर दिनांक 17 मार्च 2020 पासून ते शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे नुकताच पार पडलेला श्रीरामनवमी उत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व पदयात्रींनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे दिनांक 04 जुलै ते 06 जुलै 2020 रोजी श्रीगुरुपौर्णिमा उत्सव येत असून याकालावधीत पदयात्री साईभक्तांनी करोना विषाणू (कोव्हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये व संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्री.डोंगरे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com