नगरमध्ये आणखी 7 जण ठणठणीत

नगरमध्ये आणखी 7 जण ठणठणीत

42 पैकी 37 जणांना घरी सोडले : सहा अहवालांची प्रतीक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हा एकवटला असल्याचे चित्र असून मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना जिल्हावासियांनीही प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी बुधवारी सात व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. आणखी सहा व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

14 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले

द्विवेदी म्हणाले, महत्त्वाच्या संस्था, देवस्थाने, आस्थापना यांनी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने तेथील गर्दी ओसरली आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाल्यास प्रादुर्भाव आटोक्यात येईल. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी बुधवारी सात व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले.

अजून सहा व्यक्तींचे अहवाल येणे शिल्लक आहेत. आतापर्यंत 42 व्यक्तींची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली असून त्यापैकी 37 जणांना नमुना चाचणी निगेटीव आल्याने घरी सोडण्यात आले. त्यांना त्यांच्या घरी देखरेखीखाली ठेवले आहे. बुधवारी आणखी 14 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले असून या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे.

दरम्यान, परदेशातून परत आलेल्या व्यक्तींची केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी केली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णालयात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी करुन घ्यावी. याबाबत कोणत्याही अफवा अथवा खोटी माहिती पसरवणार्‍यांवर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करेल, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे आणि इतर वैद्यकीय अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली. कोरोना प्रादुर्भाव उपाययोजनांसंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हयातील लोकप्रतिनिधींनीही जाहीर कार्यक्रम टाळून जिल्हावासियांना गर्दी टाळण्याचा सकारात्मक संदेश दिला आहे.

या शिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी जागरुक राहण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा. आवश्यकता असेल तरच बाहेर पडा, असा सल्लाही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला. नागरिकांनी घाबरुन न जाता स्वतःची काळजी घ्यावी. आजाराची लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन द्विवेदी यांनी केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणार्‍यांविरोधात जिल्हा पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरिया, दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करून घ्यावी.

तसेच या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही आरोग्य तपासणी करुन घ्यावी. अहवाल निगेटीव आल्यानंतर घरी सोडण्यात आलेल्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ असा शिक्का मारला आहे. या व्यक्तींना 14 दिवस कोणाच्या संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनीही स्वताच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन द्विवेदी यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com