शिर्डी पर्यटनस्थळाबाबत विकास करण्यास सरकार प्रयत्नशील – ना. अदिती तटकरे

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – पर्यटनावर संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था उभारू शकतो. सद्यस्थितीत महाराष्ट्रात पर्यटनवाढीस वाव आहे. यामुळे राज्यात पर्यटनवाढ होऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिर्डी पर्यटनस्थळाबाबत विकास करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असेल, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले.

राज्याच्या महाविकास आघाडीच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी दुपारी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश कोते, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, तालुका उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, अमित शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर, विशाल भडांगे, प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना. तटकरे यांनी सांगितले की राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये युवा वर्गाला संधी मिळाली आहे. चांगला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले तर महाराष्ट्र राज्य देशात नंबर एकवर आल्याशिवाय राहणार नाही. राज्यात बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर देतांंना सांगितले की, औद्योगिकरणाचा नीचांक झाला आहे.

याबाबतीत बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रमेश गोंदकर तसेच सुधाकर शिंदे यांनी ना. तटकरे यांच्याकडे साईजन्मभुमी वाद संदर्भात शिर्डी ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणावी, अशी विनंती केली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *