मुळा व भंडारदरा धरणातून उद्यापासून पहिले आवर्तन

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मुळा आणि भंडारदरा-निळवंडे धरणातील पहिले आवर्तन हे 22 जानेवारी रोजी 6 वाजता सुरू करण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात काल पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मुळा धरणाचे रब्बीचे एक आणि उन्हाळी एक असे दोन आवर्तन घेण्याचे तूर्त ठरविण्यात आले आहे. त्यानुसार पहिले आवर्तन 22 जानेवारीपासून सुरू होईल ते सुमारे 26 दिवसांचे असेल. त्यानंतर उन्हाळी आवर्तन सुमारे 45 दिवसांचे असेल. निळवंडे, भंडारदरा धरणातून एक रब्बी आणि तीन उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

याशिवाय, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार निलेश लंके, आमदार रोहित पवार यांची बैठकीस उपस्थिती होती. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अलका अहिरराव आणि मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी आवर्तनासंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या पाऊस चांगला झाल्याने शिवारात काही प्रमाणात पाणी दिसत आहे. धरणक्षेत्रातही पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

पाण्याची नासाडी करु नका
काही भागात शेतपीकांना पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन येत्या 22 जानेवारीपासून भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्यात यावे तसेच यंदा पाणी मुबलक आहे. शिवाय जायकवाडी धरणही भरले असल्याने समन्यायी पाणी वाद उफाळणार नाही. त्यामुळे आहे तो पाणीसाठा जपून वापरावा, पाण्याची नासाडी होऊ नये तसेच या पाण्याचा सर्वांना लाभ मिळावा अशा भावना मंत्रीगण, आ. लहू कानडे आणि अन्य प्रतिनिधींनी मांडल्या.

चार आवर्तने करून पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल अशा नियोजनाच्या ना. गडाखांच्या सूचना
मंत्री शंकरराव गडाख यांनी मुळा धरणाचे पहिले रोटेशन तीन टीएमसी पाण्याचे द्यावे. चार रोटेशन करण्याचा प्रयत्न करावा आणि पावसाळ्यापयर्ंंत पाणी शिल्लक ठेवण्यासोबत पाण्याची नासाडी करू नये, अशा सूचना दिल्या. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार सोनई करजगाव पाणी योजनेचे पाणी मंजूर गावांना मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यावी असे सांगत पाणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने काय उपाययोजना केल्या याची माहिती देण्याचे आदेश दिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *