अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असून यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून पुढील 10 दिवस गरज असलेल्या सुमारे सात हजार कुटुंबांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घरपोच किराणा देणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
आ. जगताप यांनी शहरात अनेकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते. याला अनेक व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी प्रतिसाद दिला. गरजवंत सात हजार कुटुंबांना किराणा माल घरपोच देण्यासाठीची तयारी सुरु आहे. त्याची पाहणीही आ. जगताप यांनी केली. ते म्हणाले, कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले.
हातावर पोट भरणार्यांची संख्या शहरात मोठी आहे. उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये व कोणीही घराबाहेर पडू नये, यासाठी प्रेरणा प्रतिष्ठानने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये गव्हाचे पीठ सुमारे 25 टन, साखर 5 टन, तूर 5 टन, तेल 5 हजार लीटर, बेसनपीठ अडीच टन, मसाले, चहा पावडर, जीरे, मोहरी, बिस्कीटे, मीठ, लाईफबॉय व रीन साबण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.