Tuesday, April 23, 2024
Homeनगरशेतकर्‍यांच्या दोन लाखांवरील कर्जाचा विचार लवकरच – महसूलमंत्री थोरात

शेतकर्‍यांच्या दोन लाखांवरील कर्जाचा विचार लवकरच – महसूलमंत्री थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेतकर्‍यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. हे करत असताना एकाही शेतकर्‍याला रांगेत किंवा फॉर्म भरण्याची गरज पडली नाही. त्याचबरोबर दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांचाही प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने प्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापराव पा. शेळके, महिला व बालकल्याण सभापती अनुराधाताई नागवडे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कैलासराव वाकचौरे, नागवडे कारखान्याचे राजेंद्र नागवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जग्गनाथ भोर, व्हा. चेअरमन भाऊसाहेब कुटे, कैलास वाकचौरे, विनायक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

ना. थोरात म्हणाले, मागील वर्षी सर्वसामान्य शेतकरी हा दुष्काळाने होरपळला होता. त्यातून सावरल्यानंतर पुन्हा अतिवृष्टीचे संकट एका मागून एक आलेल्या संकटांमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. अशा पद्धतीने बळीराजा काम करत आहे. म्हणून पुढच्या कालखंडात शेतकरी सुखी झाला पाहीजे. यासाठी आमचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्या नंतर आम्ही पहिल्यांदा शेतकर्‍यांसाठी 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे.

त्यासाठी एकाही शेतकर्‍याला रांगेत किंवा फॉर्म भरण्याची गरज पडली नाही तरीही अजून शेतकर्‍यांचे प्रश्न शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांचाही प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांचाही विचार करण्यात येणार आहे. मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार. यामध्ये शाश्वत उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यावर राज्य सरकार काम करणार असून पुढच्या काळात हे काम करण्यात येईल. दुधाच्या व्यवसायातही खूप अडीअडचणी असून कष्टही आहेत. या देशात अन्न धान्य परदेशातून आणावे लागत होते.

आज हा देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. यामध्ये आपल्या सर्वांचे मोठे योगदान आहे. शेतीचा काळ बदलत गेला. मोठ्या प्रमाणावर उत्पादने सुरु झाली. आज दुध उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. डॉ. तांबे, राजश्रीताई घुले, प्रतापराव पा.शेळके, अनुराधाताई नागवडे यांचीही भाषणे झाली.

यावेळी बीजमाता राहीबाई पोपेरे, जालींदर वाकचौरे, शांताबाई खैरे, आशाताई दिघे, सुप्रियाताई झावरे, दत्तात्रय काळे, भाऊसाहेब कुटे, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, रमेश देशमुख, शरद नवले, सिताराम राऊत, धनंजय गाडे, बाजीराव दराडे, पुरुषोत्तम आठरे, सोनालीताई रोहमारे, सुषमाताई दराडे, सोमनाथ पाचारणे, शाम माळी, अशोक पवार, रंजनाताई मेंगाळ, सुनंदाताई जोर्वेकर, सुनिताताई भांगरे, उज्वलाताई डुबे, निर्मलाताई गुंजाळ, निशाताई कोकणे, शहाजीराजे हिरवे, पुरुषोत्तम लगड, बाबासाहेब दिघे, पोर्णिमा जगधने, बाळासाहेब रहाळ, रामभाऊ साळवे, महेश सूर्यवंशी, संगीताताई दुसुंगे, नंदाताई गाढे, मीराताई शेटे, मनीषाताई गागुंर्डे, शिवाजी नेमाणे, महेंद्र गोडगे, सुधाकर दंडवते, सोनाली साबळे, संगिता गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या