शंकरराव गडाख मंत्रिपदाची जबाबदारी समर्थपणे पेलतील

jalgaon-digital
4 Min Read

ना. गडाखांच्या देवगड येथील भेटीप्रसंगी भास्करगिरी महाराज यांचे गौरवोद्गार

देवगडफाटा (वार्ताहर) – शंकरराव गडाखांच्या रूपाने नेवासा तालुक्याला प्रथमच कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे तालुक्याला आनंद झाला असून त्यांच्यात कामे करण्याचे धाडस असल्याने ते राज्यात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करतील व मंत्रिपदाची जबाबदारी समर्थपणे पेलतील असा विश्वास श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केला.

श्री क्षेत्र देवगड येथे ना. शंकरराव गडाख यांनी भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या सत्कारप्रसंगी भास्करगिरी महाराज बोलत होते. कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शंकरराव गडाख यांनी मंत्रिपदाचे काम चालू करण्यापूर्वी श्री क्षेत्र देवगड, शनिशिंगणापूर व टोका येथील 1008 श्री बालब्रह्मचारी महाराज येथील मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

श्री क्षेत्र देवगड येथे भास्करगिरी महाराजांनी ना. शंकरराव गडाख यांचे स्वागत केले. या प्रसंगी भास्करगिरी महाराज म्हणाले, शंकरराव गडाख यांनी आपल्या जीवनात काम करत असताना यश अपयश याचा विचार न करता केवळ समाजाकरता कामे केली. त्याचे फळ म्हणजे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असतानाही त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. नेवासा तालुक्याला हा बहुमान प्रथमच मिळाला असून त्यामुळे तालुक्याला आनंद झाला आहे. शंकरराव गडाख राज्यासह तालुक्यातील रखडलेली व नवीन विकासकामे,करतील शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवतील. कामे करण्याचे धाडस असल्याने ते मोठ्या प्रमाणात कामे करतील असा विश्वास व्यक्त केला.

ना. शंकरराव गडाख म्हणाले, श्री क्षेत्र देवगड येथे दर्शन घेऊन व महंत भास्करगिरी बाबांचे आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात करणार आहे.
या प्रसंगी पांडुरंग महाराज गिरी, काँग्रेस नेते विनायकराव देशमुख, बाळासाहेब पाटील, बजरंग विधाते, युवा नेते योगेश म्हस्के, कैलास झगरे, पिनू जगताप, अनिल दरंदले, राजेंद्र उंदरे, सरपंच अजय साबळे, भीमाशंकर वरखडे, पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, शिवाजी मते, विजय चापे आदी उपस्थित होते. नामदार शंकरराव गडाख यांनी सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले व बालब्रम्हचारी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

देवगड फाटा येथे शंकरराव गडाख यांचे फटाक्यांची आतषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सौ. सविता झगरे यांनी औक्षण केले व नंतर सत्कार करण्यात आला. सरपंच सौ. सुमन पुंड, कैलास झगरे, इकबाल शेख, अशोक रुपनर, संजय लोखंडे, गिननदेव झगरे, गणेश भोरे, सतीश बाचकर, उस्मान शेख, चांगदेव थोरात, जगन्नाथ नरोडे, भाऊसाहेब मोटे, बाळासाहेब थोरात, अशोक पुंड आदी उपस्थित होते.

दरम्यान शनिशिंगणापूर येथेही ना. गडाख यांनी संपूर्ण कुटुंबासमवेत येऊन दर्शन घेतले. त्यावेळी शिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर, विश्वस्त बापूसाहेब शेटे, बाळासाहेब बोरुडे, अध्यक्ष अनिता शेटे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व शनीची प्रतिमा देऊन सन्मान केला.

खात्याबाबत उपस्थितांत चर्चा
देवगड येथे बोलताना शंकरराव गडाख यांनी राज्यासह तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी काम करायचे असे सांगितले. त्यामुळे त्यांना कृषी अथवा तत्सम खाते मिळू शकण्याचे हे संकेत तर नाहीत ना? अशी चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये होत होती.

…आणि मी मंत्रिपद स्वीकारण्यास तयार झालो – ना. गडाख
श्री क्षेत्र देवगड येथे बोलताना ना. शंकरराव गडाख म्हणाले, काहीही झालें तरी शिवसेना सत्तेत राहणार असल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गडाख साहेब, मी व प्रशात गडाख आमच्यात बैठक झाली व शिवसेनेला पाठिंबा देण्याचे ठरवले व मुंबईला गेलो. त्याच बैठकीत शिवसेनेच्या वतीने सांगितले की, गडाख साहेबांचे जिल्ह्यासह राज्यात मोठे काम आहे. त्यामुळे जर शिवसेनेला पाठिंबा दिला तर तुम्हाला राज्यमंत्री पद देऊ असे सांगितले असता माझा भाऊ प्रशांतने कॅबिनेट मंत्रिपद द्यावे असे सांगितले. मी नाही म्हटले; परंतु गडाखसाहेबांनी मला समजावून सांगितले व हा भार शेतकर्‍यांसाठी पेलवावा लागेल असे सांगितले व मी तयार झालो. राज्यात मी मोठे काम करून दाखवेन असेही ते म्हणाले.

काँग्रेस व राष्ट्वादी पक्षात गडाख साहेबांनी 50 वर्षे काम केले परंतु त्यांना पाहिजे तो सन्मान दिला गेला नाही; परंतु त्यांच्या राज्यातील केलेल्या कामाची पावती शिवसेनेने दिली.
– विनायक देशमुख, काँग्रेस नेते

Share This Article