जिल्हा परिषेदतील स्थायीच्या सदस्यत्वाचा वाद संपेना
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेतील स्थायीसह अन्य चार विषय समित्यांमधील सदस्यांच्या निवडी 15 दिवसांनंतर देखील प्रलंबित आहेत. जि. प. च्या चार जुन्या पदाधिकार्यांची रिक्त असणार्या चार विषय समित्यांतील नियुक्त करण्याचे अधिकार 15 दिवसांपूर्वी झालेल्या विशेष सभेत अध्यक्षांना देण्यात आलेले होते. मात्र, अद्याप या निवडी झालेल्या नाहीत. यासह जिल्ह्यात नव्याने निवड झालेल्या 14 पंचायत समिती सभापती यांची देखील रिक्त असणार्या त्या त्या विषय समितीत निवड करणे शिल्लक आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने आता त्यांची अन्य विषय समित्यांच्या सदस्यपदी निवड करावी लागणार आहे. विखे या आतापर्यंतच्या सर्वाधिक काळ असणार्या अध्यक्षा असल्याने त्यांना मानाच्या स्थायी समितीत स्थान मिळावे, असा प्रोटोकॉल आहे. मात्र, या ठिकाणी काँग्रेसने जोरदार दावा केल्याने हा विषय प्रलंबित आहे. स्थायीच्या सदस्यात्वाचा घोळामुळे उर्वरित जलव्यवस्थापन, महिला बालकल्याण, पशूसंवर्धन मधील एक तर अर्थ समितीमधील प्रत्येकी 2 जागा भरण्यास उशीर होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बुधवारी (आज) महाविकास आघाडीची पहिली स्थायी समितीची सभा होत असून यापूर्वी स्थायीतील रिक्त पदाच्या निवडी होणे आवश्यक होते. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी सरळ तोंडावर बोट ठेवले आहे. यामुळे रिक्त असणार्या 19 विषय समित्यांमधील सदस्यांच्या जागांवर कधी नियुक्त्या होणार, विखे यांना स्थायी समितीत स्थान मिळणार की नाही, याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने 27 जानेवारीला सभापती निवडी आणि रिक्त होणार्या समितीमधील सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावली होती. त्या सभेत अध्यक्षा घुले यांना सर्वाधिकार देण्यात आले होते. मात्र, 15 दिवसानंतर त्यावर निर्णय झालेला नव्हता.
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन उपाध्यक्ष राजश्रीताई घुले आता अध्यक्ष झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा विषय नाही. तर सभापती उमेश परहर यांच्याकडे आहे, तेच सभापती पद आहे. तर माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, सभापती अनुराधा नागवडे, सभाती अजय फटांगरे, सभापती कैलास वाकचौरे यांना नवीन समितीत स्थान द्यावे लागणार आहे. यासह नव्याने उपाध्यक्षा झालेले प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, सभापती काशिनाथ दाते आणि सभापती मीरा शेटे यांच्या मूळ समितीतील सदस्य संपल्याने त्या ठिकाणी नवीन सदस्यांना स्थान द्यावे लागणार आहे.