देवगडचे अश्व प्रदर्शन हे राज्याचे मुख्य आकर्षण- ना. सौ. घुले

देवगडचे अश्व प्रदर्शन हे राज्याचे मुख्य आकर्षण- ना. सौ. घुले

संगमनेर (प्रतिनिधी)- देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन व स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर वाढला असून संगमनेरचे हे अश्व प्रदर्शन राज्याचे मुख्य आकर्षण ठरले असल्याचे गौरवौद्गार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार राजश्रीताई घुले यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा देवगड येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व संगमनेरमधील अश्वप्रेमी असोशिएशनच्यावतीने आयोजीत अश्व स्पर्धा व पशुपालन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आ. आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, काशिनाथ दाते, जि.प चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, मिराताई शेटे, सुरेशराव थोरात, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, साहेबराव गडाख, अ‍ॅड. बाबासाहेब गायकर, आर.एम. कातोरे, मिलिंद कानवडे, भाऊसाहेब जाधव, वैशाली पावसे, बबनराव शिंदे, डॉ. प्रमोद पावसे, अभिजीत जोशी, गुरुबित सिंह, श्री. चव्हाण, नानासाहेब जाधव, रफीक फिटर, किरण गुंजाळ, सर्जेराव पर्बत, मकरंद मुळे, नानसाहेब पर्बत आदी मान्यवर उपस्थित होते. अश्व प्रदर्शनात विविध अश्वांनी सादर केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हजारोंची उपस्थिती ही या स्पर्धेची वैशिष्ट्ये ठरली.

राजश्रीताई घुले म्हणाल्या, संगमनेर तालुका हा ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून इतरांना दिशादर्शक ठरला आहे. दुष्काळी परिस्थितीतही या तालुक्याने सहकारातून समृद्धी निर्माण केली आहे. येथील सहकार व दुग्ध व्यवसाय मोठा असून रणजितसिंह देशमुख यांनी सुरू केलेले हे अश्व प्रदर्शन राज्यात सर्वात मोठे ठरत आहे. आगामी काळात याचा राष्ट्रीय पातळीवर लौकिक होईल.

आ. आशुतोष काळे म्हणाले, घोड्यांचे महत्त्व मोठे आहे. घोड्यांचा छंद सर्वत्र मोठ्या प्रमाणात जोपासला जातो. पशुपालन हा शेतकर्‍यांसाठी मोठा हा जोडव्यवसाय ठरला आहे. रणजितसिंह देशमुख यांनी चांगली संकल्पना पुढे आणली आहे. या प्रदर्शनामुळे या भागाचे नाव राज्यभरात पोहचले आहे.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, देवगड देवस्थानचे महत्त्व वेगळे आहे. खंडोबाचे वाहन घोडा असल्यामुळे या अश्व प्रदर्शनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या संख्येने महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यातील व्यापार्‍यांनी या अश्व प्रदर्शनास हजेरी लावली आहे. या तालुक्याचे नाव महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. त्यांनी केलेल्या विकासाच्या कामांमुळे व या तालुक्यातील सहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याचा लौकिक मोठा आहे. अश्वप्रेमी संघटनेने मागील वर्षांमध्ये पेमगिरी ते शिवनेरी आणि संगमनेर ते पट्टा किल्ला ही घोडेस्वारी मोहीम राबविली. राज्यभरातून अनेकजण या स्पर्धेसाठी उपस्थित असून पुढील वर्षी आणखी मोठी स्पर्धा होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी मधुकर गुंजाळ, प्रशांत पोखरकर, शिवाजी जगताप, सुनील तुंबारे, किरण मिंडे, नानासाहेब जाधव, भाऊसाहेब जाधव, रणजित नगरकर, अजय नॅन्सी, कैलास दिवटे, विजय महाजन, बाळासाहेब राहाणे, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, संदीप पावसे, व्ही. एम. पावसे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अ‍ॅड. सुरेश जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध शेतकर्‍यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वागत डॉ. प्रमोद पावसे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व रवींद्र नेहे यांनी केले तर आभार जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे यांनी मानले.

अश्वांच्या नृत्यांनी प्रेक्षक भारावले
सुमारे 667 अश्वांनी सहभाग घेत सादर केलेले अश्व नृत्य, साहसी नृत्य, थाळा नृत्य, बुलेटवरील नृत्य व बाजेवरील थरारक नृत्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. एकापेक्षा एक सरस अश्व नृत्य सादर झाल्याने उपस्थित सर्व प्रेक्षक भारावले. तर गाय, बैल, शेळी, कुत्रा, कोंबडी, राजहंस पक्षी, कबुतर, डांगे बैल, खिल्लारी गाय, गिर गाय आदींच्या सहभागाने हे प्रदर्शन अविस्मरणीय ठरले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com