सरकारी कर्मचार्यांच्या कामकाजाची वेळ वाढली
जेवणासाठी अर्धातास वेळ, शिपायांच्या वेळेतही बदल
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सरकारी कर्मचार्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने जाहीर केल्यानंतर आता त्याच्या नियमांचा जीआर (शासन निर्णय) 24 फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे. त्यात पाच दिवसांचा आठवडा कोणास लागू नसेल हे तर स्पष्ट केलेले आहेच, शिवाय पाच दिवसांचा आठवडा लागू असणार्या कर्मचार्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित करण्यात आली आहे.
दिनांक 29 फेब्रुवारी, 2020 पासू शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत असून त्यामुळे सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील.
सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी राहील.
तसेच सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 अशी राहील.
या कायालयीन वेळेमध्ये दिनांक 4 जून, 2019 च्या शासन पदरपत्रकानुसार दुपारी 1 ते 2 या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भुत असेल.
ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्याांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, शासकीय रूग्णालये, चिकित्सालये, पाणीपुरवठा प्रकल्प, सफाई कामगार इ. यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत.
अशा प्रकारच्या कार्यालयांची यादीही सरकारने दिली आहे. या यादीत दिलेल्या प्रकारात मोडणार्या इतर कार्यालयांनासुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही.