नगर जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांना दिलेल्या कर्जमाफीपैकी 31 मार्चअखेर जिल्ह्यातील 2 लाख 39 हजार 406 शेतकर्यांच्या खात्यावर 1 हजार 464 कोटी रुपयांची रक्कम वर्ग झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यावर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली आहे. 31 मार्चअखेर जिल्हा बँकेच्या 2 लाख 16 हजार 44 शेतकर्यांना 1 हजार 225 कोटी रुपयांचा लाभ मिळाला असून ही रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे.
तर व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जमाफीस पात्र असणार्या 23 हजार 362 शेतकर्यांच्या खात्यावर 239 कोटी रुपयांची रक्कम वर्ग झालेली असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. उर्वरित पात्र शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होणार आहे. दरम्यान, सर्वत्र कोरोनाचा कहर असल्याने कर्जमाफीची पुढील प्रक्रिया कोरोनानंतर समोर येणार आहे.