अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-औरंगाबाद हायवेवरील गजराजनगर परिसरात गादी कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
एक तास आगीच्या तडाख्यात कारखान्यातील सर्व साहित्य जळाले. जवळच असलेल्या बांबूच्या कारखान्याला देखील आगीची झळ बसली. याबाबत माहिती अशी की, अमीर जाकीर शेख, समीर जाकीर शेख, अस्लम भाई यांच्या मालकीचा गजराजनगर येथे गादी कारखाना आहे. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने गादी कारखान्यास आग लागली. आग लागल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आली.
दोन अग्निशमन गाड्या आल्यानंतर आग अटोक्यात आणली. तोपर्यंत गादी कारखाना जळाला होता. शेजारी असलेल्या बांबूच्या कारखान्याला देखील झळ बसली. गादी कारखान्यामध्ये दोन गॅस टाक्या होत्या. त्यांनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीमुळे नगर-औरंगाबाद हायवेवर दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी झाली होती. आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.