जिल्हा बँकेसंदर्भात दाखल याचिकेवर आज सुनावणी

जिल्हा बँकेसंदर्भात दाखल याचिकेवर आज सुनावणी

निवडणूक लांबणार की रंगणार : जिल्ह्याचे लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात दाखल औरंगाबाद खंडपिठातील याचिकांवर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीत बँकेच्या निवडणुकीसंदर्भात अंतिम आदेश होण्याची शक्यता असून बँकेची निवडणूक रंगणार की लांबणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देत त्या तीन महिने पुढे ढकल्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे नगर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेची निवडणूक कार्यक्रम थांबविण्यात आला होता. या विरोधात नगर जिल्ह्यातून सहा ते सात याचिका औरंगाबाद खंडपिठात दाखल झाल्या होत्या. या सर्व याचिका क्लब करून त्यावर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने बँकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी ठराव संकलित करण्याचे अंतिरिम आदेश दिले होते. त्यानूसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीसाठी मागील पंधरवड्यात ठराव घेण्याचा कार्यक्रम पूर्ण केला आहे.

आता हे ठराव निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे असून त्यानूसार प्रारूप मतदार यादी तयार करण्यात येऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, खंडपीठातील याचिकेवरील सुनावणी अद्याप पूर्ण झाली नसून आज सुनावणी आहे. या सुनावणी दरम्यान, खंडपीठ काय निर्णय घेणार यावर बँकेचा निवडणूक कार्यक्रम अवलंबून राहणार आहे.

आजपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍याच्या कर्ज खात्याचे प्रामाणिकरण झाल्यावर 48 ते 72 तासात संबंधीत शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा होणार आहे. त्यानूसार आजपासून पात्र शेतकर्‍यांच्या कर्जखात्याच्या कर्जाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती सहकार खात्याकडून देण्यात आली. दरम्यान रविवारी सायंकाळपर्यंत 30 हजारांहून अधिक कर्जखात्याचे प्रमाणिकरण झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com