Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्हा बँकेच्या ठरावावरून सोसायटीच्या सचिवाचे अपहरण

जिल्हा बँकेच्या ठरावावरून सोसायटीच्या सचिवाचे अपहरण

संचालक पानसरे, नाहाटांसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध तालुक्यांत सेवा संस्था मतदार संघाच्या प्रतिनिधींसाठी ठराव केेले जात आहेत. अशातच तालुक्यातील कोथुळ सेवा संस्थेच्या ठरावासाठी संचालक मंडळाची बैठक होऊ नये म्हणून या सेवा संस्थेचे सचिव राजेंद्र खोल्लम यांचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुध्द पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

सध्या विविध संस्थांचे ठराव केले जात आहेत. यासाठी विविध राजकीय गटांकडून व्यूहरचना केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातही ठराव घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच कोथूळ संस्थेची रविवारी ठरावासाठी बैठक घेण्यात येणार होती. पण सचिव राजेंद्र मधुकर खोल्लम ( रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) यांचे शनिवार दि.11 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले नी त्यांंना एका अज्ञातस्थळी खोलीत डांबून ठेवले. रविवारी दि.12 रोजी होणार्‍या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीस हजर राहिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच बैठकीस गैरहजर रहावे म्हणून सचिव खोल्लम यांना पिंपळगाव पिसा येथून मोटारसायकलवर बसवून घारगाव येथे आणले व त्यानंतर चार चाकी वाहनात जबरदस्तीने बसवून पुणे कृषी विद्यापीठात नेले. तेथे त्यांनी सोसायटीचा चार्ज का आणला? असे म्हणत क्रमांक 2 ते 8 यांनी ठराव झाला तर तुला संपवून टाकू, तुला गाडीखाली चिरडून मारून टाकू? अशी धमकी देत एका खोलीमध्ये डांबून ठेवले.

याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार बन्सीलाल नाहाटा यांच्य सह कल्याण बाबासाहेब शिंदे, धनंजय सुधाकर लाटे, विजय पाटोळे, महेश पानसरे, बाजीराव कळमकर व अमोल लाटे यांच्यावर सचिव राजेंद्र खोल्लम याच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळास भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे करीत आहेत.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीचा ठराव घेण्याच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.माजी आ.राहुल जगताप जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे हे आमने-सामने उतरणार असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या