राज्य शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 द्वारा प्राप्त अधिकाराचा बिनडोकपणे वापर केल्याने नाकाबंदीसाठी नियुक्त असलेल्या नानासाहेब सदाशिव माने या शिक्षकाला जीव गमवावा लागला. शिक्षकांना नाकाबंदी, मद्य विक्रीच्या ठिकाणी समन्वय अधिकारी व विलगीकरण केंद्र अथवा तत्सम ठिकाणची नियुक्ती तातडीने रद्द करण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या अधिकाराचा वापर करून राज्यात अनेक ठिकाणी शिक्षकांना पोलीसांसह नाकाबंदीसाठी मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची संरक्षणात्मक साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सांगली येथे नानासाहेब सदाशिव माने यांची नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीसांसह मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आले.
शिक्षकांना नाकाबंदीसाठी कोणत्या धोरणाखाली नियुक्त केले याचेही भान ठेवण्यात आले नाही. माने रात्री नाकाबंदीची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना एका ट्रकने चिरडून टाकले. या अपघातामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून जबाबदार अधिकार्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.