Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्हा रूग्णालयात करोना टेस्ट लॅब कार्यान्वित

जिल्हा रूग्णालयात करोना टेस्ट लॅब कार्यान्वित

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी : आयसीएमआरने दिली अधिकृत मान्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करोना-19 चाचणी प्रयोगशाळा उभारली असून इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी त्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (नागपूर) निदेशक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल (डॉ) विभा दत्ता यांनी या संदर्भात पत्राद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना कळविले आहे.

- Advertisement -

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर, त्यांचे सहकारी यासाठी तांत्रिक बाबी आणि आवश्यक मानके पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करीत होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारलेली ही करोना टेस्ट लॅब आयसीएमआरच्या मानकांनुसार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ 20 दिवसात ही लॅब तयार करण्यात आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गुरूवारी या लॅबची पाहणी करून माहिती घेतली होती.

लॅबची उभारणी पूर्ण झाल्यानंतर चाचणी स्वरुपात औरंगाबाद येथील एका रुग्णाचा घशातील स्त्राव तपासणीसाठी काल या लॅबकडे पाठविण्यात आला. त्यानंतर त्याचे लॅबमध्ये पृथ:करण करुन तो अहवाल नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. तत्पूर्वी लॅबमधील पायाभूत सुविधा दिलेल्या निर्देशांप्रमाणे निर्माण केल्याची खात्री करण्यात आली. स्त्राव अहवालाचे परीक्षण करण्यात आले.

तो बरोबर आल्यानंतर तसा अहवाल आयसीएमआरकडे पाठविण्यात आला. आयसीएमआरने सर्व निकष पूर्ण करीत असल्याचे स्पष्ट करीत या लॅबला चाचणीसाठी अधिकृत मान्यता देत असल्याचे सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील रुग्णांच्या कोरोनासंदर्भातील चाचण्या सुरुवातीला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही) आणि नंतर लष्करी वैद्यकीय महाविद्यालय येथे केल्या जात आहेत.

पहिल्या टप्प्यात दोनशे चाचण्या
आता जिल्ह्यातील कोरोनाची लक्षणे जाणवण्यार्‍या व्यक्तींची चाचणी येथेच करणे शक्य झाले आहे. एका पाळीत 100 अशा 300 चाचण्या घेणे शक्य होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दोन पाळीत काम केले जाणार असून दिवसाला 200 चाचण्या अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या