अत्यावश्यक सेवेचा उडाला फज्जा – संजय छल्लारे
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या करोना आजाराने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा जागरुक होऊन दक्षता घेताना दिसत आहे. मात्र श्रीरामपूर नगरपरिषद त्याला अपवाद आहे. नगरपरिषदेची रुग्णवाहिका गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने पालिकेचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी केला आहे.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे. मात्र श्रीरामपूर नगरपरिषदेची रुग्णवाहिका गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. रुग्णवाहिका म्हणजे अत्यावश्यक सेवा आणि आताच्या या संकटाच्या काळातच पालिकेची रुग्णवाहिका गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याने नगरपरिषद प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. दोन ते तीन दिवसांपासून शहरातील नागरिक नगरपरिषदेच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधत आहे. परंतु वाहन विभागातील कर्मचारी नागरिकांना रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगत आहे आणि त्याचा अनुसभव मला स्वतःला आल्याचे संजय छल्लारे यांनी म्हटले आहे.
याबाबत अधिक विचारपूस केली असता असे सांगण्यात आले की, वेळेवर सर्व्हिसिंग न झाल्याने सदर रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाण्याच्या टाकीजवळ चालू आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन किती जागरुक आहे हे दिसून येते आहे, असे छल्लारे यांनी म्हटले आहे.
पालिकेचे बजेट 150 कोटींचे !
श्रीरामपूर नगरपरिषदेचे सुमारे 150 कोटींचे वार्षिक बजेट आहे. आणि अशा अटीतटीच्या प्रसंगी अत्यावश्यक सेवेचा बोजवारा उडाला आहे. यापूर्वी देखील पालिकेचे अत्यावश्यक सेवा देणारे वाहन कधी डिझेल अभावी तर कधी गाडीचे टायर खराब झाल्याने बंद असतात. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन नेमकी करते काय? असा सवाल संजय छल्लारे यांनी उपस्थित केला आहे.