जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्यात तापमान किमान अठ्ठेचाळीस अंशाच्या वर पोहोचते. दरवर्षी मार्च महिन्यापासून तापणारा उन्हाळा यावर्षी दोन महिने उशिराने आगमन झाले आहे. असे असले तरी मे महिन्याची सुरुवातच कडक उन्हाने झाली होती. या सप्ताहात रविवार दि.24 रोजी सर्वाधिक म्हणजे 46अंशसेल्सिअस तापमानाची नोंद मुक्ताईनगर, रावेर, सावदा, वरणगाव येथे तर जळगावसह भुसावळ शहराच्या तापमानाची नोंद 45.6 अंशसेल्सिअस झाली आहे. जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून दि.27 मेपर्यंत तीन दिवस तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक डॉ.निलेश गोरे यांनी वर्तविली आहे.
खानदेशात विशेषत: जळगाव जिल्ह्यात 48अंशावर तापमानाचा उच्चांक नेहमी दिसून येतो. गतवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. मात्र, यावेळी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातच नव्हे तर मे महिन्यात तिसर्या सप्ताहात दोन तीन दिवसांसह ढगाळ वातारणात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्याचा परिणाम येथील तापमानावर झाला. नेहमीप्रमाणेच तापत्या चैत्राच्या उन्हाचे चटके मे महिन्यात अधिकच जाणवत आहेत.
रविवार, दि. 24 मे रोजी चोपडा, धरणगाव 46अंश, चाळीसगाव 42 अंश, एरंडोल 45अंश, फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर, सावदा, वरणगाव 46अंश, अमळनेर, भडगाव, पाचोरा, पारोळा, यावल, जामनेर 45, बोदवड 44अंश,जळगाव 45.6 अंश अशी जिल्ह्यातील तालुक्यांची तापमान नोंद असून शेजारील धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 43 अंश नोंदवण्यात आले आहे.
एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा सरासरी 40 ते 42 अंश दरम्यान तापमानाचा पारा स्थिर राहिला. मात्र, मे महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाने आपली दाहकता सुरू झाली आहे. ‘मे हीट’च्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली आहे,असे वेलनेस फाऊंडेशनचे निलेश गोरे यांनी सांगितले.