चाळीसगावच्या अतिक्रमण निर्मूलनासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा !

खुल्या भूखंडावर नगरसेवकांसह नातेवाईकांचे अतिक्रमण?

चाळीसगाव । प्रतिनिधी

चाळीसगावात रस्त्यांच्या कडेला वाढत्या अतिक्रमणामुळे शहरांचा श्वास अतिक्रमणामुळे कोंडु लागला आहे. वाहनधारकांना वाहने चालवतांना अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत चाळीसगावच्या अतिक्रमण निर्मूलनासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.

अतिक्रमणामध्ये काही राजकिय पुढार्‍यांसह, कार्यकर्ते व पन्टरांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आ. मंगेश चव्हाण हे परवा शहरातून होणारी अवघट वाहतुक थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या हिम्मतीला सर्वपक्षीयांनी प्रतिसात दिला होता. आता आमदारांनी चाळीसगाव शहराला लागलेली अतिक्रमणांची खरुज घालविण्याची कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. आमदारांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी पुढाकार घेवून पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये यावे, अशी चाळीसगावातील सुज्ञ नागरिकांडून मागणी होत आहे.

चाळीसगाव नगरपालीका गेल्या अनेक वर्षांपासून अंतिक्रमणाबाबत मूग गिळून गप्प बसलेली आहे. तर वाहतुक शाखेच्या पोलिसांकडून व इतर सामाजीक घटनांकडून वेळोवेळी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेकडे मागणी करण्यात आली आहे. तरी देखील काही एक उपयोग झालेला नाही. न.पा.कडून अतिक्रमणांबाबत ठोस कारवाई आतपर्यंत का केली गेली नाही, हा देखील प्रश्न आहे. जिल्ह्यातील इतर शहरांच्या मानाने चाळीसगाव शहरात अतिक्रमणाचा त्रास मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एकही रस्ता मोकळा श्वास घेण्याचा लायकीचा ठेवला नाही.

चाळीसगाव शहरातील वाहतुक समस्या दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत असतांना, लहान-मोठे अपघात होऊन सर्वसमान्याचे जीव गेले आहेत. तरी देखील या समस्येवर कायमस्वरूपी इलाज करावा असे कुणाला वाटत नाही. लोक मेले, बेजार झाले तरी हरकत नाही. खरे तर रस्त्यांनी मोकळा श्वास घेणे तशी अवघड बाब नाही. पण नगरपालीका व शहर वाहतुक शाखेकडे तशी इच्छाशक्तीच नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेऊन, त्याचे बकालपण बाजुला जावून शहराचे सौंदर्य अधिक उठावदार व्हावे, यासाठी आता आमदार मंगेश चव्हाण यानीच पुन्हा दुसर्‍यादा अ‍ॅक्शन मोडमध्ये येवून अतिक्रमण निर्मूलन हटाव मोहिम हाती घेण्याची गरज आहे.

त्यासाठी आपला कार्यकर्ता असो कि विरोधकांचा त्याचे हितसंबंध बाजूला ठेवून कडक पाऊल उचलण्याची त्यांच्याकडून शहरवासियांना अपेक्षा आहेत. शहरातून अवजड वाहतुक बंद करण्यासाठी त्यांनी नुकताच रुद्रअवतार धारण करुन, चक्क रात्रीच्या वेळी रस्त्यवर उतरुन प्रशासनाला कारवाईसाठी जागे केले होते. आता त्यांनी दिवसाढवळ्या अतिक्रमण निर्मूलनमोहिम हाती घ्यावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मतपेंटीसाठी अतिक्रमण बोकाळले- दर पंचवार्षिकला राज्यकर्ते येतात आणि आपल्या जाहिरनाम्यात चाळीसगाव शहर सुदंर व स्वच्छ करुन असे वचन देतात, परंतू आजपर्यंत एकाही राजकर्त्यांनी ते पूर्णता; पाळलेले दिसत नाही. केवळ स्वार्थ व खूर्चीसाठी आतापर्यंत शहराचे अतिक्रमण बोकाळले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे मतपेटी होय, मतासाठीचे राज्यकर्ते काठोर पाऊले उचलत नसल्याचे चाळीसगावातील समाजसेवकांडून सांगण्यात येत आहे.

आक्रमक पाऊल उचलणार
नगरसेवकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी न.पा.च्या जागेवर व भर रस्त्यावर अतिक्रमण करुन, टपर्‍या अनाधिकृतपणे ठेवलेल्या आहेत, आणि त्या भाडे तत्वावर दिल्या आहेत. त्यामुळेच आतापर्यंत शहरातील अतिक्रमण निघालेले नाही. तसेच नगरपरिषदेमध्ये अतिक्रमण काढण्यासंबंधी ठराव देखील आतापर्यंत झालेला नाही. न.पा.कडून अतिक्रमण काढण्यासाठी ठराव न झाल्यास संभाजी सेना याबाबत आक्रमक पाऊल उंचलणार आहे.
– लक्ष्मणबापू शिरसाठ, अध्यक्ष संभाजी सेना

कठोर पावले उचलावित
शहर हे गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळाख्यात सापडलेले आहे. याला सर्वस्वी जबाबदर नगरपरिषद आहे. न.पा.तील बर्‍याच नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांनी खुल्या भुखंडावर अतिक्रमण केलेले आहे. ज्यांच्या हातात न.पा.ची सत्ता आहे. अशा जबाबदार लोकप्रतिनिधीनी अतिक्रमण काढण्यासाठी काठोर पाऊले उंचालावित हिच अपेक्षा आहे.
– प्रा.गौतम निकम, जनआंदोलन खान्देश

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com