अहमदनगर (प्रतिनधी) – राज्यातील शेतकर्यांचा सात-बारा कोरा करणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे अशा काही मागण्यांसाठी 12 डिसेंबरला राज्यव्यापी निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.
घनवट यांनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत जाहिरनाम्यात संपूर्ण कर्जमाफी व सात-बारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे पक्ष सत्तेत आले आहेत; मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप होताना दिसत नाही. याशिवाय अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. या दिवशी शेतकरी रस्त्याच्याकडेला एकत्र येऊन शेतकर्यांच्या मागण्या व सरकारकडून अपेक्षा या विषयावर आपली मते व्यक्त करतील. कोठेही रास्ता रोको अगर रहदारीला अडथळा करण्याचा प्रयत्न होणार नाही.
सकाळी 11 ते दुपारी चारपर्यंत हे आंदोलन ठिकठिकाणी सुरू राहणार आहे. त्यानंतर सरकारला दहा दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.