मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 2.14 वाजता शिरपूरचे आ. काशिराम पावरा यांच्याशी भ्रमणध्वनीवर प्रत्यक्ष संपर्क साधून तालुक्याच्या परिस्थिती विषयी विचारपूस केली. यावेळी आ.पावरा यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेवून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलताना आ.पावरा यांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीचा फटका शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला बसल्याचे सांगितले. संचारबंदी मुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले असतांना शेतकरी व शेतमजुर तसेच हातावर पोट असलेल्या गोरगरिबांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची विनंती केली.
राज्यभर व परराज्यात शिरपूर तालुक्यातील असलेले मजूर व नोकरीनिमित्त बाहेर गेलेल्या असंख्य महिला, पुरुष, मुलेमुली यांना शिरपूर येथे आणण्यासाठी सहकार्य करावे असेही सांगितले. तसेच विविध पिकांची, फळपिकांची, भाजीपाल्याची वाहतूक न झाल्यामुळे नुकसान झाले आहे त्याबाबत मदत देण्याची मागणीही केली.
शिरपूर तालुक्यातील वास्तव स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट करून आ.काशिराम पावरा यांनी शिरपूर शहर व तालुक्यात पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पाऊस, वादळ व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशीही विनंती केली.