सार्वमत
केंद्रीय पथकाच्या अंदाजामुळे महापालिका सतर्क
मुंबई – मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात 70 हजारापर्यंत जाण्याचा अंदाज केंद्रीय पथकाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले असून रूग्ण संख्येत वाढ झालीच तर मुंबईच्या विविध भागात 50 हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची उपचाराविना हाल होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
मुंबईतील करोना संसर्गाची स्थिती आणि उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी नुकतेच केंद्रीय पथक मुंबईत येऊन गेले. या पथकाने मेच्या दुसर्या आठवड्यात मुंबईतील करोना रूग्णांची संख्या 70 हजारावर जाण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर उपाययोजना करण्याचे आदेश राज्य सरकारने पालिकेला दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. रुग्ण संख्या वाढलीच तर संकटाचा सामना करण्यासाठी पालिकेने आपल्या अधिकार्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. चाचण्यांची संख्या वाढवली असून त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांवर रूग्णालये, पालिका शाळांमध्ये उपचार सुरू केले आहेत. पालिकेच्या शहर आणि उपनगरातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून सध्या 25 हजार खाटा आहेत, तसेच पालिकेच्या शाळा, गोरेगावचे एनएसई मैदान, वांद्रे येथील बीकेसी मैदान यासह विविध ठिकाणी आणखी 25 हजार अशा 50 हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.