अकोलेच्या शेतकर्‍यांची मुंबईतील व्यापार्‍यांकडून लाखोंची फसवणूक

अकोलेच्या शेतकर्‍यांची मुंबईतील व्यापार्‍यांकडून लाखोंची फसवणूक

मुंबई – एकीकडे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे एपीएमसीत जीवापाड जपून वाढवलेल्या शेतमालाची किंमत न देता व्यापारी वर्गाकडून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला व्यापार्‍यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून करण्यात आला आहे.

मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राहणार्‍या 25 शेतकर्‍यांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाठवला होता. आपल्या शेतात तळहातावर पिकविलेला कोबी विकण्यासाठी या शेतकर्‍यांनी व्यापारी वर्गाच्या हवाली डोळे झाकून दिला होता. मालाला चार पैसे आल्यानंतर घेतलेले कर्ज आणि पोरांबाळांची शिक्षणाचा खर्च भागवता येईल अशी भाबडी आशा या बळीराजाने मनाशी केली होती.

मालाचे लाखो रूपये देण्याऐवजी भाजीपाला मार्केटमधील काही व्यापार्‍यांनी त्यांना चालढकल केली. शेतकर्‍यांचे एकूण 13 लाख 50 हजार रूपयांची देणी देण्यास टाळाटाळ करून दिलेला 12 लाख रूपयांचा चेकही वटला नव्हता. यानंतर 6 लाख रूपये रोख देत 7.5 लाख रूपयांची देणी थकीत ठेवली होती. अखेर सात महिने उलटल्यानंतर आपल्या मालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी एपीएमसी प्रशासनाचे कार्यालय गाठले. पण त्या ठिकाणीही त्यांना योग्य तो न्याय मिळत नसल्याने अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडे व्यापार्‍यांच्या विरोधात शेतकर्‍यांनी तक्रार केली आहे.

एपीएमसी प्रशासनाकडे तक्रार गेल्यानंतर 7.5 लाख रुपयांचा धनादेश व्यापार्‍यांना देण्यास सांगण्यात आले असून तो न वटल्यास पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे एपीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर आपल्या कुटुंबातील प्रमुखांचे निधन झाल्याने पैसे देण्यास उशीर झाल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com