नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातील शेतकऱ्यांना नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे संकटाला सामोरे जावे लागते. अनेक भागांत जंगली जनावरांपासून या शेतकऱ्यांना मोठा धोका असलेला बघायला मिळतो.
शेतकऱ्यांना त्यांच्या जिवाचाच नाही तर जंगली जनावरांपासून पिकालाही वाचवावे लागते. कर्नाटकमधील एका गावात कॉफी आणि सुपारीच्या पिकांना माकडांपासून वाचविण्यासाठी एक झोप उडविणारी शक्कल येथील शेतकऱ्यांनी काढली आहे.
शिवमोगा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव कुत्र्यांना वाघासारखा रंग दिला आहे. यामुळे माकडे शेतातील पिकांची नासाडी न करत घाबरून पळून जातात असे येथील शेतकरी श्रीकांत गौड़ा यांनी सांगितले.
ते म्हणाले, याआधी वाघाच्या खेळण्यांचादेखील उपाय करून बघितला आहे. याचा परिणाम बघायला मिळाला नसला तरी काही अंशी येथील शेती वाचविण्यात या शेतकऱ्यांना यश आले.
गोव्यातील या खेळण्या मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, या खेळण्यांचे रंग निघून गेल्याने माकडांना त्याची भीती वाटत नव्हती त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान काही थांबत नव्हते.
यानंतर श्रीकांत यांनी शेतातील पाळीव कुत्र्यांना वाघासारखे बनवले. त्यांना तसाच रंग दिला. लहान आकारातले वाघच दिसलेल्या कुत्र्यांना बघून माकडे शेतातून पळून जातात.
त्यांना दररोज दोन वेळा शेतात घेऊन जाऊन माकडांना सध्या पळविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या गावातील बहुतेक शेतकरी आता हा पर्याय वापरत असून संपूर्ण गावातील कुत्रे लहान वाघाप्रमाणे शेतात वावरताना नजरेस पडतात.