मुंबई – लॉकडाऊन काळात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कोरोना उपाययोजनांच्या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरूवारी बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात लोकांना जीवनाश्यक वस्तू मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे या पार्श्वभूमीवर तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग टळावा यासाठी लॉकडाऊनमध्ये दुकानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी राज्सरकारनं दिली आहे.
दुकानांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आणि त्यामुळे असलेला संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील असेही सांगण्यात आले आहे. .