Sunday, April 28, 2024
Homeअग्रलेखमन सुद्ध तुझं गोस्ट आहे पृथ्वी मोलाची

मन सुद्ध तुझं गोस्ट आहे पृथ्वी मोलाची

आज जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जात आहे. स्वच्छता, पर्यावरण, प्रदूषण, जंगल, वन्यप्राणी, पक्षी अशा अनेक विषयांवर समाजात जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने विविध जागतिक दिवस साजरे केले जातात. दरवर्षी एक संकल्पना ठरवली जाते. त्याला अनुसरून जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षीच्या स्वच्छता दिवसाची संकल्पना ‘चला जगभर ते करू या’. या दिवसाच्या निमीत्ताने घनकचरा व्यवस्थापन, जंगल-समुद्रकिनारे, नद्या आणि रस्त्यांवरचा कचरा संकलित करून परिसर स्वच्छता करणे अपेक्षित आहे. कचऱ्याची समस्या हा जागतिक चिंतेचा विषय आहे. ती दिवसेंदिवस उग्र होत आहे.

कितीतरी प्रकारचा कचरा जमा होतो. कचरा कोणत्याही स्वरूपाचा असला तरी त्याचा परिणाम एकच आहे, तो म्हणजे जीवसृष्टीच्या अस्तित्वाला धोका. ई कचऱ्याचे आव्हान जटिल होत आहे. कचरा केवळ पृथ्वीतलावर जमा होतो का? अवकाशातही कचऱ्याने त्याचे बस्तान बसवले आहे. अवकाशात सुमारे नऊ हजार टन कचरा घिरट्या घालत आहे अशी माहिती नासाने जाहीर केली आहे. जगभर स्वच्छतेच्या अनके मोहीमा सतत राबवल्या जातात. सातत्याने स्वच्छता करण्यासाठी अनेक संस्था स्वयंस्पुर्त पुढाकार घेतात. लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. मिळून सगळ्यांचा उद्देश जीवसृष्टी आणि पर्यायाने मानवाचे अस्तित्व अबाधित ठेवणे हा आहे. स्वच्छता जीवसृष्टीची असो की मनाची, याविषयी जागरूकतेचा अभाव आढळतो. मनाची स्वच्छता तितकीच महत्वाची आहे जितकी परिसराची. मने स्वच्छ झाली तर अनेक समस्या कदाचित निर्माण होणारच नाही. कचरा का निर्माण होतो? हिंसक वृत्ती का वाढते? किरकोळ कारणांसाठी माणसे एकमेकांच्या जिवावर का उठतात? सहज जीव का घेतात? नातेसंबंध किचकट का बनतात? घटस्फोटाचे प्रमाण का वाढते? नैराश्य-राग-ताणतणाव-चोरी- न्यूनगंड-अहंगंड-गर्व- आसक्ती-स्वार्थ असे मनाचे विविध आजार का बळावतात? हिंसेच्या एखाद्या प्रकरणात तसे करणारी व्यक्ती नैराश्यात होती असे निष्पन्न होते. ती व्यक्ती मनाने आजारी असते. भावनांच्या रूपाने माणसांनी अनेक प्रकारचा कचरा मनात साठवलेला असतो असे तज्ज्ञ म्हणतात. त्याचा अपरिहार्य परिणाम त्याच्या एकूणच आयुष्यावर आणि समाजावर होतो. जसे विचार असतात, तशाच भावना निर्माण होतात. तसा दृष्टिकोन तयार होतो. तोच कृतीत उतरतो. मिळून माणसाचे व्यक्तिमत्व तयार होते. याकडे किती सजगपणे पाहिले जाते? निदान जाणीव तरी असते का? याचे उत्तर तज्ज्ञ दुर्दैवाने नकारार्थी देतात. हरवलेले सामाजिक भान हे त्याचे चपखल उदाहरण. स्वच्छता दिवसाच्या निमीत्ताने माणसे त्यांच्या परिसराची स्वच्छता करतात. ही ऊर्जा सातत्याने जागी ठेवायला हवी. ती एका दिवसापुरती मर्यादित नको. अशा स्कारात्मकतेवर आधारित चळवळी राबवल्या जातात. सामाजिक संस्था चालवल्या जातात. माणुसकी, सहवेदना, सहकार्य, मदतीची भावना यांचा आविष्कार माणसे अनुभवतात. दक्षिण कोरियात नृत्य शिकण्यासाठी दोन मुली पुण्यातील त्यांच्या घरातून दादरला पळाल्या. घाबरलेल्या त्या दोन ,मुलींना एका टॅक्सी चालकाने पाहिले. त्याने पोलिसांना फोन केला. त्याच्या चांगल्या मनामुळे त्या मुली सुखरूप घरी परतू शकल्या. असे चांगले विचार, भावना, कल्पना आधी मनात जन्म घेतात. मगच त्या प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण होते. त्या मनाची स्वच्छता देखील केली जायला हवी. मन सुदृढ तर आरोग्य सुदृढ आणि आयुष्य सुंदर. ‘मन सुद्ध तुझं गोस्ट आहे पृथ्वीमोलाची..’ असे शांताराम आठवले का म्हणून गेले त्याची जाणीव या दिवसाच्या निमित्ताने सर्वाना व्हाव्ही

- Advertisment -

ताज्या बातम्या