मुंबई | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणकडून दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्यात आल्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. याप्रसंगी त्यांनी ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.
मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी 23 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्याची सूचना देण्यात आली आहे. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही तसेच महावितरणच्या वेबसाईटवर बिले उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीजचोरी व बिलासंबंधीच्या तक्रारीला अनुसरून ग्राहकांच्या घरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी करू नये अशाही सूचना डॉ. राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत.