Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसंकट टळलेले नाही !

संकट टळलेले नाही !

– अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

कोरोना विषाणूच्या महासंसर्गाने विज्ञानाच्या साहाय्याने यंत्रसंख्या वाढवत प्रगतीचे ढोल पिटणार्‍या मानवाला अक्षरशः मेटाकुटीस आणले आहे. वैद्यकीय प्रगती कशी झपाट्याने होत आहे हे सांगत आपली पाठ बडवून घेत असतानाच एडस्, एबोला, मारबर्ग, लासा, लेप्टोस्पायरोसिस, सार्स, आणि आता ‘कोरोना’ अशी नव्या दमाची विषाणूंची फौज मानवजातीवर तुटून पडत आहे.

- Advertisement -

निसर्गाविरूध्द पुकारलेल्या युद्धात अहंकारी मूढ मानवाचा पराभव होणार हे निश्चित होते. तो झाला आहे. आता जीव वाचवा. पृथ्वीला, निसर्गाला शरण जा. कारण विषाणू येण्याचे कारण जैविक विविधता, झाड- जंगल, माती नष्ट होणे इतर जीवसृष्टी व जैविक वस्तुमान नष्ट होणे हे आहे.

गेल्या काही वर्षांतील मानवाचा प्रवास पाहिला आणि निसर्गावर मात करण्याची विकासाच्या नावाने सुरु असलेली धडपड पाहिली असता, कधीना कधी संहारक क्षमता बाळगणारा, पण हवा, पाणी किंवा डासांमार्फत प्रसार होणारा विषाणू येणार हे नक्की होते. हवेतून प्रसार होणारा या क्षमतेचा विषाणू कोरोनाच्या रूपात आला आणि त्याने पाहता पाहता जगाची झोप उडवली. 2018 मध्ये आपण विचार करायचो की, 2020 मध्ये आपल्याकडे उडणार्‍या गाड्या असतील, दुसर्‍या ग्रहावर शहरे वसलेली असतील इत्यादी. पण आजची परिस्थिती काय आहे ? आज आपल्याला लोकांना सांगावं लागतं की हात कसे धुवावेत. अजून पाण्यातून वा डासांतर्फे पसरणारा असा विषाणू आलेला नाही हे नशीब आहे.

सर्दी, पडशाचे जिवाणू वातावरण व तापमानातील छोट्या फरकाने नाश पावतात परंतु सर्वात प्रतिकुलतेत जगू शकणार्‍या जिवाणूंची कल्पनाही करणे कठीण आहे. तीव्र सल्फ्युरिक आम्लात जगणारे, तीव्र किरणोत्सारात, भूकवचात खोलवर आत्यंतिक उष्णतेत लोह, सल्फर, मँगेनीज इ. खाऊन जगणारे, बर्फात किंवा उकळत्या पाण्यातही टिकणारे सूक्ष्मजीव आहेत. आतापर्यंत आढळलेला पेनिसिल्व्हानिया विद्यापीठातील संशोधकांनी जागृतावस्थेत आणलेला सर्वात दीर्घजीवी सजीव हा 600 मीटर खोलीवर मेक्सिकोतील मिठाच्या खाणीत आढळलेला, 25 कोटी वर्षे सुप्तावस्थेत राहिलेला जिवाणु आहे. खरे जैविक जग हे माणसाच्या निरिक्षणापलिकडचे आहे. पृथ्वी हा जसा ‘जलग्रह’ आहे तसाच तो ‘सूक्ष्मजीवग्रह’ आहे. खरे तर पृथ्वीवर आपण जगत आहोत कारण सूक्ष्मजीवांनी परवानगी दिली आहे.

गेल्या शतकात, सन 1932 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने ‘पेनिसिलीन’ या प्रतिजैविक औषधाचा शोध लावला. सूक्ष्मजीव, जंतांमुळे मानवाला होणार्‍या व्याधींपासुन मुक्तता मिळत गेली. देवीचा रोगी दाखवा आणि शंभर रूपये मिळवा, अशा जाहिराती 50 वर्षांपूर्वी लावल्या जात होत्या. अनेक रोगांना जगातुन हद्दपार केल्याची ग्वाही मिरवली गेली. मात्र गेल्या चार दशकांत विषाणूंनी होणार्‍या भयंकर नव्या रोगांनी आक्रमण केले आणि ज्यांना आपण संपवले या भ्रमात होतो ते रोगही पुनरागमन करत आहेत. एडस, एबोला, मारबर्ग, लासा, लेप्टोस्पायरोसिस, सार्स, आणि आता ‘कोरोना’ अशी नव्या दमाची विषाणूंची फौज मानवजातीवर तुटून पडत आहे. अँन्थ्रॅक्ससारखे विषाणू तर अमेरिकन लष्करानेच तयार केले असा संशय आहे.

सन 1981 मध्ये एडसचा पहिला रूग्ण मिळाला. हा विषाणू, मानवी पेशीसारखा असल्याने तो नष्ट करण्याच्या प्रयत्नात मानवी पेशी नष्ट होतात, ही समस्या आहे. वैद्यकीय विज्ञानाचा रोगमुक्तीचा दावा का फोल ठरत आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे. हे एक प्रकारे, रोगाचे मूळ कारण न शोधता लक्षणांवर उपाय करणे आहे.

‘विषाणू’ हा माणसासाठी हानिकारक अतिसूक्ष्मजीव, अनुकूल स्थिती व पोषण उपलब्ध असल्यास, एका दिवसात 280000 अब्ज जीव वाढवतो. आपण लोकसंख्या वाढली वाढली म्हणून ओरडा करतो. पण पृथ्वीवर माणसांची संख्या वाढून वाढून किती झाली, तर सुमारे 750 कोटी. आता समजुन जा, सूक्ष्मजीवांच्या संख्येचा व क्षमतेचा विचार केला तर आपण त्यांच्या खिजगणतीतही नाही. भले आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ व शक्तीवान मानत असू! 750 कोटींना ते कधीही पुसुन टाकू शकतात. माणसाने सूक्ष्मातील शक्ती ओळखली व अण्वस्त्रे तयार केली. परंतु निसर्गाच्या भात्यातही अशी अस्त्रे आहेत याचे भान त्याला राहिले नाही.

नवे विषाणू का निर्माण होत आहेत?

1) नैसर्गिक जनुकीय बदल : असा बदल उत्क्रांतीने हळुहळू किंवा अचानक होऊ शकतो.

2) दीर्घकाळ सुप्तावस्थेत राहिलेला विषाणू ः परिस्थिती बदलल्याने प्रगट होणे किंवा क्रियाशील बनणे. सध्या तापमानवाढीमुळे लाखो वा कोट्यवधी वर्षे न वितळलेला बर्फ, वितळत आहे. त्याखाली दडलेले मृत जीव अतिशीत स्थितीत तेव्हा होते, त्या स्वरूपात सापडतात. पण लाखो वा कोट्यावधी वर्षे सुप्तावस्थेत जिवंत राहिलेले नैसर्गिक जिवाणू व विषाणूदेखील आता बर्फ वितळल्याने मुक्त होत आहेत.

3) प्रयोगशाळेत बदल घडवून बनवलेला विषाणू ः या विषाणूंच्या मानवामधील प्रवेशास काही कारणे दिली जातात. जसे की, प्राण्यांशी अनैसर्गिक संभोग, पाण्यात मिसळलेल्या प्राण्यांच्या मलमूत्राचा रक्तात प्रवेश, रक्त वा स्त्रावाचा संपर्क, किंवा आहारात, संसर्ग झालेल्या प्राणी, पक्षी, साप, इ. चे मांस येणे इ. पण या गोष्टी तर इतिहासात पूर्वीही झाल्या असणार. यातील नवे परिमाण समजुन घेणे आवश्यक आहे.

एबोला

1970 च्या सुमारास आफ्रिका खंडाचे दोन तुकडे करणारा शेकडो फूट रूंदीचा प्रचंड दक्षिणोत्तर महामार्ग बांधण्यास सुरूवात झाली. जसजसा हा हायवे आफ्रिका खंडाच्या अंतर्भागात शिरू लागला, तसतशी आतापर्यंत लाखो, करोडो वर्षे, मानवापासून अस्पर्श राहिलेल्या जंगलांची तोड सुरू झाली. महामार्गाच्या विस्ताराबरोबर जंगल कापण्याची अत्याधुनिक सामग्री वापरणारे, लाकडाच्या लोभाने आजूबाजूच्या जंगलांचा दूरवर नाश करत गेले. मध्य आफ्रिकेतील किन्शासा’ प्रांतात एबोला नदीच्या दुर्गम खोर्‍यात महामार्ग पोचला. या प्रक्रियेत लाखो वर्षांपासूनच्या, जीवजातींच्या परस्परांवर अवलंबुन असलेल्या अस्पर्श रचनेस आकस्मिक तीव्र धक्का बसला. अन्य जीवांमध्ये परोपजिवी स्वरूपात राहणार्‍या विषाणूंची आश्रयस्थाने अचानक नष्ट झाली. तोपर्यंत हे विषाणू माणसासाठी अपरिचित होते. निरूपद्रवी होते. परंतु आता त्यांनी माणसात प्रवेश केला. एडसचा प्रसार या हायवेवरून होऊ लागला. हा हायवे एडस हायवे म्हणून ओळखला जातो.

रिचर्ड प्रेस्टन या लेखकाचे ‘हॉट झोन’ हे पुस्तक वाचावे. सत्यकथन करणारे हे पुस्तक वाचताना आपण कादंबरी वाचत आहोत असे वाटते. मारबर्ग व संसर्ग झालेल्यांपैकी 90 टक्के लोकांना ठार करणार्‍या एबोला विषाणूंनी रूग्णांच्या शरीराची अवस्था, इंद्रिये विषाणूंनी थबथबणे, शरीराला छीद्रे पडणे, शरीर फुटणे, विषाणू पसरवणार्‍या रक्ताची व द्रवांची कारंजी उडणे हे सर्व शहारे आणणारे आहे. या अमानवी विकासाला विरोध होऊ नये म्हणून विषाणूंचा मानवातील प्रवेश व प्रसारांची कारणे मानवजातीला समजू दिली जात नाहीत.

डीएनए, आरएनए आणि प्रथिने अशी विषाणूंची घडण असते. या रचनेतील अतिसूक्ष्म बदलही नव्या स्वरूपात मानव व इतर प्राण्यांस भयंकर हानिकारक ठरू शकतो. विषाणूंमधील हा बदल मानवाने निर्माण केलेल्या आकस्मिक दबावामुळे घडत आहे. जहाल विषारी रसायने, वायू, व किरणोत्सारी द्रव्यांचा खाड्या, नद्या, सागर, भूमी व वातावरणात सतत शिरकाव होत आहे. कोट्यवधी वर्षे समृद्ध जैविक विविधता बाळगणार्‍या परिसंस्थांची गेल्या काही दशकांत अतिवेगाने मोडतोड झाली. हजारो चौरस किमी क्षेत्रफळाची जंगले दरवर्षी सपाट करण्यात आली, जाळण्यात आली. नैसर्गिक रचना, हवामान यात मोठे बदल झाले. तापमान वाढत गेले. निसर्गास अपेक्षित नसलेल्या पद्धतीने मानवप्राणी जगू लागला. नवनव्या तंत्रज्ञानाबरोबर निसर्गाच्या शोषणाची चढाओढ सुरू झाली. लेप्टोस्पायरोसिससारख्या आजारांच्या विषाणूंचे आणि खाड्या, खाजणे, नद्या, सागरांतील प्रदूषण व जीवसृष्टीचा समूळ नाश यांचे नक्की नाते आहे.

जहाल रसायनांना तोंड देण्यासाठी अतिसूक्ष्म जीवांना आपल्या शरीरात बदल करावा लागतो व त्यांचे बदललेले गुणधर्म इतर सजीवांना अपायकारक ठरतात. मुंबईच्या गाभ्यात असलेल्या, भारतातील सर्वात प्रदूषित अशा जलसाठ्याची, माहीमच्या खाडीची परिस्थिती पहावी. म्हणजे विकासाचा जीवसृष्टीच्या संदर्भातील अर्थ कळेल.

शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भयंकर संहार करणारा प्लेग, त्यावेळच्या सर्वाधिक शहरीकरण झालेल्या हाँगकाँगवरून आलेल्या बोटीतील बाधित उंदरांमुळे पसरला होता. मानव व त्याआधीचा त्याचा पूर्वज वानर लाखो करोडो वर्षे जंगलात होते. हजारो वर्षे माणसे गावांत होती. छोटे समूह परस्परांपासून वेगळे होते. त्यामुळे जीवन शक्य झाले. विषाणू प्रसार व त्यामुळे एकाच वेळी होणार्‍या उच्चाटनाचा धोका नव्हता. आता शहरे व पृथ्वीव्यापी पर्यटनामुळे तो आहे.

अधिकाधिक वस्तुनिर्मिती, अधिकाधिक उपभोग, जीवनात इंद्रियसुखांना स्वैर प्रोत्साहन, अशी आनंदाची व्याख्या शारीर पातळीवर उतरते व खाणेपिणे, व्यसने, स्वैर संभोग, ही जीवनशैली बनते. यामुळे पॉप गायक एल्व्हीस प्रिस्लेसारख्या ग्लॅमरच्या क्षेत्रातील अनेकांचे बळी एडस्ने घेतले. आतापर्यंत एडससारखा अतिसंहारक विषाणू, रक्त वा वीर्यातून पसरत होता. पण अतिसंहारक क्षमता आणि हवा- पाण्यातुन प्रसार या दोन गोष्टी एकत्र आल्यावर, मानवाचा ‘न भूतो न भविष्यति’, असा संहार होणारच होता. ते पर्व आता सुरू झाले आहे. आधी सूक्ष्मजीव होते आपण नव्हतो. त्यांच्यापैकी हरितद्रव्यरूपी सूक्ष्मजीवांनी अनुकूल स्थिती तयार केली व जगवले म्हणून आपण जगलो. तो जैविक विकास होता. परंतु आपण भौतिक विकासाचा कृतघ्नपणा करून त्यांच्या जीवावर उठलो. विकासाच्या नावे झाडे, जंगल व नदी सागरातील हरितद्रव्य झपाट्याने नष्ट केले जात आहे. प्राणवायू कमी होत आहे व कार्बन डाय ऑक्साईड वाढत आहे. जैविक विविधता व पृथ्वीची जीवनाची धारणा करण्याची कोट्यवधी वर्षांत विकसित झालेली क्षमता नष्ट केली जात आहे. काळाचे चक्र वेगाने उलट फिरवले जात आहे. अजून पृथ्वी आपल्याला सांभाळून घेत आहे. म्हणून अन्न पिकत आहे, विषाणू आटोक्यात येत आहेत. पण जाणार्‍या प्रत्येक वर्षाबरोबर आपण उच्चाटनाकडे धावत आहोत.

भूतकाळात नेणार्‍या कालयंत्राची कल्पना, कथा कादंबरीत मनोरंजक वाटते. पण प्रत्यक्षात ती तशी नाही. आपण कालयंत्रात शिरलो आहोत. आधुनिकतेने आपल्याला खूप दूर मागच्या काळात वेगाने नेले जात आहे, जेव्हा तापमानामुळे आताची जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती पण विषाणू होते. आता आपण मोटारींत नाही तर कालयंत्रात बसून वेगाने कोट्यवधी वर्षे ओलांडत, पृथ्वीवरील, आपले अस्तित्व नसणार्‍या सूक्ष्मजीवांच्या, जिवाणु, विषाणूंच्या कालखंडात जात आहोत.

जैविक अस्त्र दहशतवाद विरोधी कायद्याचे निर्माते डॉ. फ्रान्सिस बॉयल यांच्या मते, ‘कोरोना विषाणू’, हे जैविक युद्धातील आक्रमक अस्त्र आहे. हा प्रयोगशाळेत जनुकीय बदल घडवून, युद्धासाठी कार्यक्षमतावाढ करून तयार केलेला विषाणू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेला हे माहित आहे. चीन्यांच्या बेबंद खाद्य संस्कृतीला दोष देणे ही दिशाभूल आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी शेती उत्पादन वाढवण्यासाठी चिमण्या व इतर पक्ष्यांना नामशेष करण्याचा मूर्खपणा चीनने केला. त्यापायी जैविक साखळी तुटून दुष्काळ पडला व दोन – चार कोटी माणसे भूकेने मेली. आताही ज्यामुळे विषाणू व तापमानवाढ होत आहे, तेच औद्योगिकरण व शहरीकरण ते पुढे रेटत आहेत. तेदेखील अंत जवळ आला असताना. तापमान मर्यादेबाहेर जात असल्याने उष्माघातापासुन वाचण्यासाठी वरचेवर पाणी पिणे, कडक ऊन टाळणे अशा गोष्टी सुचवल्या जातात. हे उष्माघातापासुन वाचण्याचे उपाय आहेत. तापमानवाढीवरचे उपाय नाहीत. तसेच हात धुणे, अंतर राखणे, विशिष्ट मास्क घालणे हे संसर्ग होऊ नये म्हणून उपाय आहेत. तो विषाणूंवरचा उपाय नाही. जो उपाय आहे त्यावर बोलले जात नाही.

उपाय काय?

प्रगती व सुखसोयींच्या नावाने चालू असलेला भौतिक विकास व पृथ्वी व जीवसृष्टीवर जीवनविरोधी जीवनशैली थांबवणे हाच फक्त उपाय आहे. निसर्गाच्या खर्‍या जगाच्या दृष्टीने आताचे कृत्रिम जग हे शाश्वत असणे असंभव आहे. कोरोनासारखे विषाणू मानवजातीला पृथ्वीवरून पुसुन टाकू शकतात. यात अतिशयोक्ती नाही. आता क्वारंटाईनमधे ठेवून विलगीकरण केले जाते परंतु खरे रक्षण करणारे विलगीकरण म्हणजे कृषियुगातील छोट्या खेड्यांच्या हजारो वर्षे टिकलेल्या कालखंडात परत जाणे. ते लवकर केले नाही तर अ‍ॅमेझॉनच्या किंवा आफ्रिकेतील काँगोच्या खोर्‍यातील जंगलात नग्नावस्थेत, कपड्यांचाही संबंध नाही इतके तुटक, विलग जीवन जगणारी माणसेच वाचू शकतील. तीदेखील तापमानवाढ त्यांचे उच्चाटन घडवत नाही तोपर्यंतच म्हणजे फक्त पुढील तीस – पस्तिस वर्षे. निसर्गाविरूध्द पुकारलेल्या युद्धात अहंकारी मूढ मानवाचा पराभव होणार हे निश्चित होते. तो झाला आहे. आता जीव वाचवा. पृथ्वीला, निसर्गाला शरण जा.

(लेखक भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या