शहरानजीक असलेल्या नकाणे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या नामांकित मल्लाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलासह जमनागिरी व चितोड येथील पट्टीच्या पोहणार्या तरूणांनी पाण्यात शोध मल्हारचा मृतदेहा बाहेर काढला. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मल्हार रविंद्र जगताप (वय 21 रा. राम नगर, संघमा चौक, धुळे) असे त्याचे नाव आहे. तो ख्यातनाम मल्ल म्हणून परिचीत होता. त्याला नियमित व्यायामाची सवय होती. अधुनमधून मल्हार हा नकाणे तलाव येथे पोहण्यासाठी जात होता.
आज सकाळी 7 वाजता देखील तो मित्रांसोबत नकाणे तलाव येथे पोहण्यासाठी गेला होता. पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो थोडा आत गेला. मात्र बराच वेळ होऊनही तो पाण्याच्या वर दिसला नाही. आणि परतही आला नाही. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी आरडा-ओरड केली.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे हेकॉ.मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. तर संघमा युवा मंचचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत बागुल, त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाही बोलविण्यात आले.
तोपर्यंत मल्हारसोबत असलेल्या इतरांनी जमनागिरी तसेच चितोड येथील पट्टीच्या पोहणार्या तरूणांना बोलावून घेतले होते. सर्वांनी पाण्याचा मल्हारचा शोध सुरू केला. साधारण साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास मल्हारचा शोध घेवून त्याला बाहेर काढण्यात तरूणांना यश आले. पंरतू त्याचा मृत्यू झालेला होता.
मल्हारचे आई-वडील हे नगर येथे राहतात. तो धुळ्यात आजी-आजोबांकडे रहात असल्याची कळते. याबाबत प्रथमदर्शी धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.