पक्षी नसतील तर मनुष्याचे जीवनही अशक्य ‘देशदूत संवाद कट्ट्या’वर उमटला पक्षिमित्रांचा सूर

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव । प्रतिनिधी

उत्सवासारख्या सणांच्या उत्साहात नायलॉन मांजासारख्या घातक वस्तुंचा वापर होत असल्यामुळे पक्षांचा अधिवास धोक्यात आला आहे. पक्षी हे माणसाचे मित्र तर आहेतच शिवाय ते पर्यावरणाचे रक्षणकर्ते आहेत. त्यामुळे पक्षी नसतीलतर मनुष्याचे जीवनही अशक्य आहे. असा सूर ‘देशदूत’तर्फे आयोजित संवाद कट्ट्यावर शुक्रवारी उमटला. पतंग महोत्सवातील धातुयुक्त मांजाचा पशु-पक्षी, मानवाला होणारा त्रास या विषयावर चर्चा करण्यासाठी पक्षमित्र राजेंद्र गाडगीळ व शिल्पा गाडगीळ हे सहभागी झाले होते.

त्यांचे स्वागत संपादक अनिल पाटील यांनी केले. यावेळी बोलतांना राजेंद्र गाडगीळ म्हणाले की, अलिकडे पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा धातुयुक्त मांजा पशु-पक्षांसोबत मानवालादेखील घातक आहे. हा घातल मांजा विरघळत नसल्याने जमीनदेखील प्रदुषित होते. या मांजाविरुध्द हरित लवाद प्राधिकरणाने उत्पादक विक्रेते आणि उडविणारे यांच्यावर कठोर करवाई होईल असा कायदा केला आहे. मात्र सकारात्मक मानसिकतेअभावी आजही गल्लीगल्लीत धातुयुक्त मांजाची विक्री सुरुच आहे. या मांजाची विक्री रोखण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. यासाठी पक्षीमित्र या नात्याने आम्ही स्वतः चौका-चौकात पोस्टर प्रदर्शनदेखील आयोजित करीत असतो. एकीकडे आपण पक्षांची पूजा करतो, मात्र दुसरीकडे त्यांना वाचविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिल्पा गाडगीळ म्हणाल्या की, पतंग आपण आनंदासाठी उडवितो. मात्र त्यात अलिकडे स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेतून पक्षांचे जीव जात आहेत. हा देश माझा इथली माणसं माझी या भावनेसोबतच येथील पशू-पक्षीही माझे अशी भावना जेव्हा निर्माण होईल. तेव्हाच खर्‍या अर्थाने पक्षांचे जतन होईल.

स्थलांतरीत पक्षांच्या मुद्यावर बोलतांना त्यांनी सांगितले की, 4 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान उत्तर गोलार्धातील पक्षी दक्षिण गोलार्धात अधिवासासाठी येत असतात. दलदल असलेल्या ठिकाणी हे पक्षी थांबतात. आपल्याकडे यंदा समुद्रकिनारी थांबणारा सँडरलीन हा पक्षी अधिवासासाठी आलेले आढळुन आले. मार्च एरियल, वाईड, ऑस्प्रे, रेड स्टार, फ्लवर्स, डक, असे पक्षी आपल्याकडे येत असतात. पुरान कथांमध्येदेखील पक्षांचे महत्व आढळुन येते. त्यामुळेच महाभारतात चक्रवाद पक्षाचा उल्लेख आहे. असेही त्यांनी सांगितले. यंदा पाऊस चांगला झाल्याने पक्षांना ठिकठिकाणी चांगले खाद्य उपलब्ध आहे. वाढत्या नागरिकरणाचा पक्षांवर मोठा परिणाम होतो आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्देचा फरकच लोकांना कळत नसल्यामुळे पक्षांचा अधिवास धोक्यात येत आहे.

गिधाड आणि गरुडांना पोषक खाद्य आणि वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस नगण्य होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *