नाशिक । प्रतिनिधी
स्मार्ट सिटी कंपनीकडुन गोदा प्रकल्पांतर्गत होत असलेल्या गोदाकाठालगत असलेल्या सतरा प्राचीन कुंडांना पुनर्जीवन देण्यासाठी झालेल्या सर्वेनंतर कुंड कॉक्रीटीकरणमुक्त करण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि.13) रोजी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. काही स्थानिक नगरसेवक व नागरिकांच्या आक्षेपानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने गोदावरीला मुळ रुप देण्याचे काम लांबणीवर पडले आहे.
स्मार्ट सिटी कंपनीकडुन गोदा प्रकल्पात गोदाकाठा सुशोभीकरणाच्या कामात रामकुंड ते रोकडोबा तालीम या दरम्यान गोदापात्रातील प्राचीन कुंडाचे पुनर्जीवन करण्याचे काम केले जाणार असुन हे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी या प्रकल्पांचे व्यवस्थापक सिंंंग आणि स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी सय्यद यांच्या देवांग जानी, आर्कीटेक्ट प्राजक्ता बस्ते यांच्या उपस्थित कुंडा जागेचे निश्चितीकरणासाठी कोअर कटींग करुन पडताळणी अशा सर्वेचे काम नुकतेच झाले आहे.
या कामानंतर स्मार्ट सिटी कपंनी अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांनीच येत्या शुक्रवारी (दि.13) रोजी सकाळी 9.30 गांधी तलावाजवळ कुंडावरील कॉक्रीटीकरण काढण्याचा शुभारंभ करण्याचे ठरविण्यात आले होते. याची माहिती जानी व आर्कीटेक्ट बस्ते यांना कळविण्यात आली होती. या निर्णयामुळे गोदेला मुळ रुप प्राप्त होऊन तिच्यातील जैव विविधा पुन्हा स्थापीत होऊन लवकरच गोदा कायम प्रवाहीत होणार या भावनेने पर्यावरण प्रेमी व गोदाप्रेमींनी मोठा आनंद व्यक्त केला. यासंदर्भात सोशल मिडीयात समाधानाच्या प्रतिक्रीया उमटल्या होत्या.
मात्र आज अचानक काही स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी शहर अभियंता संजय घुगे यांनी भेट घेत या कार्यक्रमावर आक्षेप नोंदविला आणि शुक्रवारी होणारा कार्यक्रम रद्द करण्याचे काम महापालिका प्रशासनाने केला आहे. या कार्यक्रमाची माहिती अधिकार्यांनी स्थानिक नगरसेवकांना दिल्याने हा विरोध झाल्याची चर्चा पुढे आली आहे. गोदावरी नदीतील प्राचीन कुंडांना पुनर्जीवन मिळावे व नदी कायम प्रवाहीत राहुन यातील जैवविविधा टिकावी ही भावना नाशिककरांची असतांना एका पवित्र अशा कार्यक्रमाला खोडा बसला आहे. यामुळे गोदा पुनर्जीवनच लांबणीवर पडले आहे.
दक्षिण गंगा म्हणुन ओळख असलेल्या पवित्र गोदावरी नदी पात्रात गांधी तलाव ते रोकडोबा तालीम या दरम्यान असलेले 17 प्राचीन कुंडांना पुनर्जीवन देण्यासाठी गोदाप्रेमी देवांग जानी यांच्यासह काही पर्यावरण प्रेमीकडुन पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील झाली होती.
गोदावरी नदीत रामकुंड परिसरात अलिकडच्या तीस पस्तीस वर्षात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने झालेल्या कॉक्रीटीकरणामुळे नदीतील प्राचीन सतरा कुंडे आणि जीवंत पाण्याची झरे दबली जाऊन यामुळे पदीपात्रातील जैव विविधा नष्ट झाली आहे. ही कुंडे पुनर्जीवत करण्यासाठी आता कॉक्रीटीकरण काढले जाणार असुन याकरिता सन 1919 आणि 2019 च्या नकाशाचा अभ्यास करुन या कुंडाचा सर्वे करण्यात आला आहे. यामुळे एक पवित्र काम दृष्टीक्षेपात आले आहे.