‘कोरोना’शी सामना करीत असतांनाच महाराष्ट्रावर संकट

‘कोरोना’शी सामना करीत असतांनाच महाराष्ट्रावर संकट

‘सारी’चा तडाखा औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू

‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या आजाराने औरंगाबाद शहरातील एका व्यक्तीचे मंगळवारी निधन झाले. सारी व करोनाची लक्षणे सारखीच आहेत, त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, सारीचे आणखी 2 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सारीग्रस्त रुग्णाचे मंगळवारी निधन झाले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पडळकर यांनी दिली.

सारी आजाराचे आणखी 2 ते 3 रुग्ण दाखल आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे. करोना व्हायरसप्रमाणे सारी या आजाराचीही सर्दी, खोकला, ताप हीच लक्षणे आहेत. औरंगाबाद शहरात करोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नसला तरी सारीच्या रुग्णाचे निधन झाले, ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. घराच्या बाहेर न पडता घरात राहूनच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

करोना व सारीची लक्षणे सारखीच

सारी या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. सारी आणि करोना या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत, फरक एवढाच आहे की, सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी, ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते.

अशक्तपणा खूप येतो. रुग्णालयात दाखल केल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवण्याशिवाय पर्याय रहात नाही. हा आजार इतका भयानक आहे की दोन, तीन दिवसांतच त्या रुग्णाचे निधन होऊ शकते, असेही डॉ. नीता पडळकर यांनी नमूद केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com