धुळे –
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक संपताच प्रभाग क्र. 12 च्या नगरसेविकेसह महिलांनी पाण्याच्या प्रश्नासाठी आयुक्तांना घेराव घालून निवेदन दिले.
स्थायी समितीची पहिली बैठक आज सभापती सुनिल बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठक संपल्यानंतर प्रभाग क्र. 12 च्या नगरसेविका अन्सारी फातीमा बी नुरुल अमीन या प्रभागमधील महिलांसह सभागृहात आल्या. व त्यांनी प्रभागात आठ ते दहा दिवस पाणी येत नाही, अशी कैफियत मांडून आयुक्तांना घेराव घातला. तसेच निवेदनही दिलेे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. 12 मध्ये काही वर्षापासून पाण्याचा पुरवठा अनियमीत केला जातो. प्रभागामध्ये पाणी सोडण्याची कोणतीही वेळ निश्चित नाही. यामुळे प्रभागातील नागरीकांचे हाल होतात. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते.
शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे व तलाव भरले आहेत. मात्र पाणी वाटपाचे नियोजन नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कबीरगंज, अंबिकानगर, वडजाईरोड या भागात आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. याबाबत दखल घेण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.