नाशिक । प्रतिनिधी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे पश्चिम किनार पट्टीवर वादळ धडकणार असून त्याचा तडाखा उत्तर महाराष्ट्राला बसण्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व तहसिलदरांना त्यांच्या पातळीवर सुरक्षेचे उपाय योजना व खबरदारिच्या सूचना दिल्या आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सकाळपासून वातावरणात गारवा बघायला मिळत आहेत. तसेच हवेची दिशादेखील बदलेली दिसून येत आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा संकेतच यातून मिळत आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार ४ जून पर्यंत या वादळाचा परिणाम व तडाखा नाशिकसह उ.महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. अतीवृष्टी, सोसाटयाचा वारा व वादळ, वीज कोसळणे या संकटाचा सामना करावा लागू शकतो.
ते लक्षात घेता नागरिकांचे स्थलांतरण, सुरक्षित निवार्याची व्यवस्था, निर्जंतुकिकरण, कोव्हीड रुग्णांचे स्थलांतरण, अौषध पुरवठा, मास्क व पीपीई किटचा साठा, आपत्ती व्यवस्थापनाची पथके व मदत कार्य याची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगर पालिका व नगर पंचायत यांना पत्राद्वारे सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे.