लॉकडाऊनमुळे विवाह समारंभ व विविध कार्यक्रमांना बंधने आल्याने सोशल डिस्टनसिंग पाळत विवाह सोहळे उरकले जात आहेत तर अनेकांनी हौस मौज होणार नाही म्हणून विवाह सोहळे पुढच्या वर्षी ढकलले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेडे येथे आज दि.8 मे रोजी एक आदर्श असा विवाह सोहळा संपन्न पार पडला, उंबरखेडे येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक संजय संतोष पाटील यांचे पुतणे शामकांत संतोष पाटील यांचे चिरंजीव अक्षय व आडगाव ता.चाळीसगाव येथील आदर्श शेतकरी वाल्मिक बाबुराव पाटील यांची कन्या चि.सौ.कां. माधुरी यांचे लग्न उंबरखेडे येथील कानुबाई मंदिरात लागले.
या लग्नाला आमदार मंगेश चव्हाण यांनी पालकत्व घेतले होते तसेच मुलीचे मामा म्हणून चाळीसगाव भागाचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व मुलाचे मामा म्हणून चाळीसगाव तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी अंतर पाट धरून या जोडप्याचा आदर्श विवाह संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नातेवाईकांची व गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती तसेच गावाचे तलाठी नन्नवरे अप्पा, पोलीस पाटील अर्चनाताई मोरे, मुलीचे आईवडील, मुलाचे आईवडील उपस्थित होते, ह्या विवाह सोहळ्याला लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा आल्याने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टनसिंग पाळत विवाह सोहळा पार पडल्याने इतरांनी देखील यांचा आदर्श घ्यावा असच म्हणावं लागेल.
आमदार मंगेश चव्हाण यांनी वधू वरांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देताना या आदर्श विवाहाप्रमाणेच वैवाहिक आयुष्य देखील आदर्शवत जगावे व स्वतःची व आईवडिलांची काळजी घ्यावी अश्या अपेक्षा व्यक्त केल्यात.