नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून आपला जिल्हा कुठल्या झोनमध्ये येणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज सकाळी केंद्राकडून अधिकृत झोन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील जवळपास १४ जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. तर ऑरेंज झोनमध्ये एकूण १६ जिल्ह्ये आहेत. सहा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे.
देशभरात लॉकडाऊनचा आजचा ३८ वा दिवस आहे. येत्या दोन दिवसांत देशातील लॉकडाऊन संपणार आहे. अनेक भागात करोना विषाणूचा अटकाव करण्यात करण्यात यश आले आहेत तर अनेक भागात मात्र, अजूनही रुग्णसंख्या वाढतेच आहे. येणाऱ्या काळात आर्थिक फटका बसू नये यामुळे केंद्राने आज तीन झोन जाहीर केले असून यामध्ये ग्रीन झोनला पूर्णपणे शिथिल करण्यात येणार आहे.
ऑरेंज झोनमध्ये ठराविक अस्थापना सुरु राहणार असून याबाबतचा निर्णय एवढ्या दोन दिवसांत केंद्र घेण्याची शक्यता आहे. आज दुपारी एक वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना तीन मे नंतर काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल याबाबतचे संकेत दिले होते.
३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह इतर रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल असे ते म्हणाले होते. मोकळीक असली तरीदेखील कुठेही घाई गडबड करू नका अन्यथा आजवर केलेले सगळे कष्ट वाया जातील असेही ठाकरे म्हणाले.
केंद्र सरकारने राज्यातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये, १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर ६ जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये केला आहे. कुठल्या झोनमध्ये काय नियमावली असेल याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.